Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: उन्हाळपाळी

डायरीची पाने: उन्हाळपाळी

डायरीची पाने:  उन्हाळपाळी

[ad_1]

इंद्रजित भालेराव4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नव्या, बदललेल्या काळाचं स्वागत करायला हवं. त्या भोवती आपली संस्कृती गुंफायला हवी. असंस्कृतपणे कुठलाच व्यवहार केला जाऊ नये. त्यामुळे कामाचा आनंद मिळत नाही.

रानात औत घालून रान उलथून टाकण्याला ‘पाळी घालणे’ असं म्हणतात. खरं तर पाळी या शब्दाचा अर्थ रिकामी चक्कर मारणे असा होतो. त्या अर्थानं, रान रिकामं असतं तेव्हा मशागतीसाठी शेतात औत घालण्याला पाळी म्हटलं जात असावं. पेरणीसाठी, कोळपणीसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी शेतात औत घालतात त्याला पाळी म्हणत नाहीत. कारण तेव्हा पेरणी करणे, तण काढणे अशा काहीतरी कामानिमित्त शेतात औत घातलेले असते. पण, असं कुठलंच प्रत्यक्ष कारण नसताना रिकाम्या रानात औत घालण्याला ‘पाळी घालणे’ म्हणतात. रिकाम्या रानात चकरा मारत केलेलं काम म्हणून तिला पाळी म्हणत असावेत. त्यातही उन्हाळ्यात रान जास्त दिवस रिकामं असल्याने या काळात रानाची अधिक मशागत करणे शक्य असते. अशा मशागतीला ‘उन्हाळपाळी’ म्हटलं जातं.

नांगराने जमीन खोलवर भेदून उलथून टाकणे, भुसभुशीत करणे, हे काम पाळीत केले जाते. त्यामुळं खालची माती वर येते. उन्हाळाभर ती उन्हात तापते. पावसाळ्यात पहिला पाऊस पडला की एकदम फुलून येते. तेव्हा पेर साधली की धान तरारून येते. अशी रानाची मशागत करणे, ही एका अर्थाने रानाची साधनाच असते. प्रत्यक्ष तसा फायदा काही दिसत नसताना केवळ रानाची तयारी करून घेण्याला मशागत म्हणतात. अशी नांगरून टाकलेली रानं, रानातली काळी माती जणू तपश्चर्येला बसलेली असते. तिचं हे तप पाऊस पडला की फळाला येतं.

पाडव्याच्या दिवशी नवा सालगडी ठरला की, त्याचं हेच पहिलं काम असायचं. कारण तेव्हा रानात कुठलंच पीक नसायचं. त्यामुळं रिकाम्या रानाची मशागत करणे, हे एकच काम त्या नव्या गड्याच्या वाट्याला यायचं. आधीच्या काळात लोखंडी नांगर असायचे. त्याला चार, सहा, तर कधी कधी आठ आणि महाभारतातल्या नोंदीप्रमाणं बारा बैलही जुंपले जात. नांगर धरण्यासाठी एक आणि बैल हाकण्यासाठी दोन्हीकडून दोन माणसं लागत. कारण एकामागं एक असे चार बैल असायचे. एकाच बाजूच्या माणसाला ते हाकणं शक्य नसायचं. अशा वेळी त्यासाठी माणसेही एकापेक्षा जास्त लागायची. लोखंडी नांगर जमिनीत खोलवर रुतल्यामुळं दोन बैलांना ओढणे शक्य नसायचे. म्हणून दोनपेक्षा जास्त बैल जुंपावे लागायचे. लाकडी नांगर असेल, तर दोन बैल ओढू शकायचे, त्यामुळे त्याला दोनपेक्षा जास्त बैल जुंपता येत नसत. पण, लोखंडी नांगराला साखळीच्या मदतीने कितीही बैल जुंपता यायचे.

चैताचा महिना या उन्हाळपाळीमध्ये निघून जायचा. पाडव्याच्या दिवशी नवा गडी कामावर आलेला असायचा, तो पुढचा सगळा महिना ही मशागतच करायचा. या कठीण काळातच नवा सालगडी कसा आहे, हेही कळायचं. तो लेचापेचा असेल, तर त्याला सालभर ठेवायचं की नाही, याचा फेरविचार करता यायचा. अर्थात फक्त सालगडीच हे काम करायचा, असं नाही. कधी कधी स्वत: शेताचा मालकही हे काम करत असे किंवा सालगड्याला करू लागत असे. अशावेळी घरून बायका टोपलंभर भाकरी आणि गाडगंभर भाजी, वाडगंभर ताक पाठवून देत. कौतुकाने जात्यावर गाणी म्हटली जायची…

बंधु गं बंधू माझा, बंधू गं गुणाचा शेताला जातोया, चैताच्या उन्हाचा। असं चैताचं गं ऊन, जशी उन्हाची आगिन गोरी गं भावजय, शेता चालली नागिन। अशा नांगऱ्याच्या, पैजा लागल्या दोघाच्या हौशा या बैलानं, शिवळा तोडिल्या सागाच्या। अशा नंदी जोड्या, जोड्या चालती येगानी बापा गं समर्थानं, नांगर केले सागवानी। असं चैताचं ऊन, ऊन गोरीला सोसंना रानीवनी दूर दूर, झाडझुडुप दिसंना। बापाचं गं शेत, कसं बिघ्यामागं बिघं नाही शिनवटा थोडा, बंधू मपलं गं वाघ। बंधूची नांगरट, सुरू ठीक्यामागं ठीकं सोईऱ्या-धाईऱ्यानं, धरलिया इरजीक।

तेव्हाच्या उन्हाळपाळीचं वर्णन अशा ओव्यांतून जुन्या बायकांनी करून ठेवलं आहे. त्यामुळं पुढच्या पिढ्यांना निदान त्याचं स्वरूप तरी लक्षात येईल. आजही उन्हाळपाळी होते, नाही असं नाही. पण, त्यासाठी नांगर आणि बैलांची गरज उरलेली नाही. आता गावात एक-दोघांकडं ट्रॅक्टर असतो. शिवारातल्या सगळ्या शेतांची मशागत, उन्हाळपाळी ट्रॅक्टरच करून देतो. त्यासाठी ना कामावर गडी ठेवावा लागतो, ना लोखंडी वा लाकडी नांगर लागतो, ना बैलांची गरज पडते. नांगर हाकणाऱ्याची जागा आता ट्रॅक्टर हाकणाऱ्यांनी घेतली आहे. तो एकरानुसार जमीन नांगरून देण्याचे भाव ठरवतो. सध्या अडीच हजार रुपये एकर असा भाव आहे. त्याला डिझेल वगैरे धरून एकरी हजारभराचा खर्च असतो. दिवसभरात पाच एकर वावर नांगरणं होतं. ट्रॅक्टरवाला रात्रंदिवस शेतात ट्रॅक्टर चालवून सगळ्यांची मशागत करून देतो. लोकांनाही आता बैल-बारदाना, त्यासाठी चारापाणी, झोपडी-मांडव या सगळ्या गोष्टी नको वाटू लागल्या आहेत. त्यामुळं हा सोपा पर्याय सगळ्यांनी स्वीकारला आहे. जमिनीला त्यामुळं काही फरक पडत नाही. उलट ट्रॅक्टरची नांगरणी लोखंडी नांगरासारखी खोलवर होते. त्यामुळे जमीन खोलवर उलथून पडते आणि उन्हाळाभर तापत राहते.

काळाप्रमाणं माणसं बदलतात. त्याच्या काम करण्याच्या पद्धती अन् त्यासाठीची साधनं बदलतात. पूर्वी नांगर हाकणारा स्वत: गाणी म्हणायचा. आता ट्रॅक्टर चालवणारा पेनड्राइव्हमधली गाणी लावून ऐकत असतो. त्याची ती गाणी आख्ख्या शिवाराला ऐकू जातात. त्या नादात तो ट्रॅक्टर चालवतो. ती गाणी अर्थात गायकांनी गायलेली असतात, त्यात त्याचा स्वत:चा सहभाग नसतो. ट्रॅक्टरची मालकीण आपल्या ट्रॅक्टर चालवणाऱ्या मालकावर गाणी लिहिते का नाही, माहीत नाही. कशासाठी लिहिल? आणि ती कुठं गायिल? आता कुठं जातं राहिलं आहे? आणि कुठं दळण्याची गरज उरली आहे? त्यामुळं तिला गाणं रचण्याची, म्हणण्याची गरजच उरलेली नाही. काळ बदलतो. बदलायलाच हवा. नव्या काळाचं स्वागत करायला हवं. त्या भोवती आपली संस्कृती गुंफायला हवी. असंस्कृतपणे कुठलाच व्यवहार केला जाऊ नये. कारण त्यामुळे कामाचा आनंद मिळत नाही, इतकेच.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments