कबीररंग: पानी के पीये बिना, कैसे मिटे पियास…

0
2
कबीररंग:  पानी के पीये बिना, कैसे मिटे पियास…


हेमकिरण पत्की15 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपलं रोजचं जगणं म्हणजे आत-बाहेरच्या संगतीसोबतचा प्रवास आहे. ही संगत व्यक्तींची, वस्तूंची, वास्तूंची, भवतालातील सृष्टीची आहे. ही संगत अर्थपूर्ण, भावपूर्ण असेल, योग्य अवकाशासह असेल, तर असा प्रवास आनंददायीच असतो. अन्यथा, मनाला ही नुसतीच गर्दी वाटते. अनेकदा कळत – नकळतपणे आपण या गर्दीचे धनी होतो. हे सारं नीटसं उमगल्यावर आपण बाहेरच्या गर्दीपासून अलिप्त होत जातो, उथळ सहवासापासून वेगळं होत स्वत:च्या मनापाशी पोहोचतो, तेव्हा आपल्याला काय जाणवतं? गंमत वाटेल, पण अशा कृतीनं आपल्याला आपल्या मनाची खरी स्थिती जाणवते. मनातलं इष्ट – अनिष्ट संचित जाणवतं. त्याविषयी आपलं चिंतन घडतं. आपण कुणाविषयी तरी बाळगलेला द्वेष, शब्दांतून कुणाचा तरी अवमान करून घेतलेलं सुख, एखाद्याच्या माघारी त्याची निंदा करून झालेला क्षणिक संतोष आणि आपण कळत- नकळत केलेल्या आत्मप्रतारणेस बाजूला सारण्याची आपली चतुराई हा असाही त्या स्थितीतील आपल्या मनाचा आशय असतो. आपण स्वत:शी प्रामाणिक असलो की, हे सारं ध्यानात येतं. आपलं मन व्यर्थ गोष्टी सांभाळून ठेवतंय, हे उमजल्यावर आपल्याला आपल्या हृदयाचं मोल जाणवतं. तरल भावस्थितीत हृदयाचे बोल आठवतात. तिथं एक शांत स्रोत लख्ख दिसतो, जिथं शब्दांहून अधिक नितळ-निर्मळ भाव व्यक्त होत असल्याचं ध्यानात येतं. आपल्या ‘असण्या’चं गहिरेपण या हृदयात आहे. हेच तर आपल्या जीवनाचं केंद्र आहे! कबीर म्हणतात, आपला ‘मी’ आपल्याला कळत नाही. या ‘मी’चं स्वातंत्र्य, अवलंबन, स्वामित्व आणि दास्यत्व कळत नाही. ते साधकाशी कळवळ्याच्या परिभाषेत बोलतात…

दासातन हिरदै नहीं,

नाम धरावे दास।

पानी के पीये बिना,

कैसे मिटे पियास।।

ज्या सद्गुरुंनी उजेडी राहून उजेडाची वाट आपल्याला दाखवलेली असते, त्यांचा दास होण्यात खळखळ कसली? पण, आपण थारा नसलेल्या मनाच्या ताब्यात असतो. या अशा मनाचा दास होणं आपल्याला आवडतं. मनानं निर्माण केलेल्या जगाचा दास होणं आपल्याला रुचतं. म्हणजे ‘असत्’चा दास होणं हीच आपली निवड असते. कबीर सांगतात की, दास्यत्व या नाशवंत जगाचं करायचं की या समग्र अस्तित्वाचं करायचं? याचा विचार साधकाला करावाच लागतो. याचं कारण म्हणजे सद्गुरुच साधकासाठी प्रकट ईश्वरी तत्त्वाचे वाटाडे असतात. कबीर म्हणतात, नुसत्या मुखानं उच्चारलेलं देवाचं नाम हृदयाशी जोडलेलं नसतं तर मनातून आलेलं असतं. आपलं मन कुठल्याही कामातील कर्तेपण सोडायला तयार नसतं. आतून या मनाला मालकी हक्क हवा असतो आणि म्हणून आपण सद्गुरुंचे दास न होता विषयसुखाचे म्हणजे कांचनकामिनीचे दास होऊन राहतो. या सत्याचा बोध खरं जगण्याचं कुतूहल असलेल्या तहानल्या जीवाला होतो. देहाचं दास्यत्व परमचेतनेला जाणून शरण गेल्यावरच संपतं. हे एक प्रकारचं स्वामित्व असतं, जे अशा चेतनेला जाणल्यानं सहज लाभतं. साधकाला हे अनुभवातूनच उमजतं.

दास कहावन कठिन है,

मैं दासन का दास।

अब तो ऐसा होय रहूँ,

पांव तले की घास।।

सद्गुरुंचा ‘मी’ शुद्ध असतो. या ‘मी’पणाला अनुसरताना साधकाला आपला ‘मी’ शुद्ध झाल्याचा भास, भ्रम होऊ शकतो. म्हणूनच सद्गुरुंविषयी साधकाच्या ठायी असलेलं दास्यत्व महत्त्वाचं असल्याचं या दोह्यातून कबीर सुचवतात. हे दास्यत्व सद्गुरुंच्या पायांखालचं गवत होण्यासारखंच आहे, असं साधकाला हृदयातून वाटणं होय. सद्गुरुंचा दास म्हणजे काय, हे नीट उमजायला हवं. दास होणं म्हणजे समर्पणातील आत्यंतिकता होय. दास होणं म्हणजे गुलाम होणं नाही. इच्छेविरुद्ध जो समर्पित होऊ पाहतो, तो गुलाम. गुलामी सक्तीतून घडते, परमप्रेमातून नाही. भयानं एखाद्याचा माथा सद्गुरुंच्या चरणावर ठेवला जाईल, पण आत्मा असा कधी झुकतो? दास्यत्व म्हणजे सद्गुरुंप्रति स्वेच्छेनं केलेलं समर्पण आहे. यात मानसिक दबाव नाही, भय नाही. आनंदात, अहोभावात आपल्या मर्जीनं आणि समग्र संकल्पासह केलेलं समर्पण आहे. कबीरांना या दास्यत्वात साधकाच्या ठायी असलेल्या अहंकाराचं विसर्जन होईल, याचा विश्वास वाटतो. त्यांनी साधकाला घडवलेलं हे दर्शन देहाचा मालक समजणाऱ्या त्याच्यासाठी आरसा होऊ शकतं.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link