घोटभर पाण्यासाठी वृद्धाची झुंज, स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतरही पाण्यासाठी संघर्षच?

0
2


Satara Maan Water Crisis : वयाची ऐंशी ओलांडली, शरीराने साथ सोडली, पण जगण्यासाठीची झुंज अजूनही सुरूच आहे. हि गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातील माण (Satara Maan Water Crisis) तालुक्यातील पांगरी गावात एका वृद्धाची. यातील पाण्यासाठीची रोजची लढाई मन हलवून टाकणारी आहे. 80 वर्षीय भिकू जाधव घरात पाण्याचा थेंब नाही म्हणून या वयातही हातपंपावर जाऊन त्यांना पाणी भरावं लागतंय. तहानलेल्या व्यवस्थेचा आणि जगण्यासाठी झगडणाऱ्या एका वृद्धाचा हा वेदनादायी संघर्षम प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Maan Water Crisis : घामाने अंग चिंब, श्वास धापा टाकतो, हात थरथरतो, पण पाणी नसेल तर जगायचं कसं?

80 वर्षीय भिकू जाधव यांच्या पाण्यासाठीचा हा संघर्ष पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल, वाकलेलं शरीर, चेहऱ्यावर खोल सुरकुत्या, पायात ताकद नाही. पण जगायचं आहे म्हणून अजूनही संघर्ष सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पांगरी गावचे भिकू जाधव. वय तब्बल 80 पण घरात पिण्यासाठी पाणी यावं म्हणून या वयातही त्यांना हातपंप गाठावा लागतो. कुटुंबामध्ये बायको नाही, ना मुले, एकटा 80 वर्षाचा आजोबा हा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करतोय. एका हाताने पंप मारायचा तर दुसऱ्या हाताने भांडी सावरायची. घामाने अंग चिंब होतं, श्वास धापा टाकतो, हात थरथरतो. पण पाणी नसेल तर जगायचं कसं? हातपंपातून थेंब थेंब पाणी बाहेर येतं आणि त्या प्रत्येक थेंबासोबत आजोबांच्या डोळ्यातली वेदनाही ओघळताना दिसते.

Satara News : दोन-दोन तर कधी तीन-तीन दिवसांनी गावात टँकर,शोकांतिका नाही तर आणखी काय? 

दोन-दोन तर कधी तीन-तीन दिवसांनी गावात टँकर येतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठीही धडपड करावी लागते. हातपंपावरून पाणी भरायचं तर ते भरलेलं पाणी सायकलवर ठेवायचं आणि थकलेल्या पायांनी घरापर्यंत न्यायचं, ही फक्त पाण्याची घागर नाही, तर एका वृद्धाच्या जगण्याची जबाबदारी आहे. एका बाजूला विकासाचे दावे, योजनांच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला 80 वर्षांचा वृद्ध अजूनही पाण्यासाठी झगडताना दिसतोय. ही शोकांतिका नाही तर आणखी काय? असंच म्हणावं लागेल.

माण तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. जलस्रोत आटत चालले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. पण ज्या वयात माणसाला आधाराची गरज असते. त्या वयात भिकू जाधव यांना पाण्यासाठी अशी झुंज द्यावी लागत आहे. हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे.

Water Crisis : अजून किती परीक्षा घेणार?

अशातच, शासनाच्या योजना कागदावर आहेत. नळजोडणीच्या घोषणा भाषणात आहेत. पण पांगरीतील भिकू जाधव यांच्या घरात अजूनही तहानच आहे. दोन-तीन दिवसानंतर येणार एक टँकर आजोबांची तहान कशी भागवणार? आजोबांचा थरथरणारा हात एकच प्रश्न विचारतोय, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही गावात पाणी कधी येणार? वृद्धापकाळात आधार द्यायचा सोडून, अजून किती परीक्षा घेणार, असच म्हणावं लागतंय.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link