वेब वॉच: बांधीव पटकथेअभावी ‘उलझ’लेला चित्रपट

0
1
वेब वॉच:  बांधीव पटकथेअभावी ‘उलझ’लेला चित्रपट


  • Marathi News
  • Opinion
  • A Film That Is ‘confused’ Due To The Lack Of A Cohesive Screenplay | Rasik Special Article By Suhas Kirloskar

सुहास किर्लोस्कर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘उलझ’ पाहताना कथा-पटकथेवर काम केले नसल्याचे जाणवत राहते.

दर्जेदार चित्रपट बनवण्यासाठी काय आवश्यक असते? उत्तम कथा आणि बांधीव पटकथा. उत्तम पटकथा म्हणजे ज्या विषयावर चित्रपट तयार करणार आहोत, त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर कथेतील पात्रांची केलेली गुंफण म्हणजे बांधीव पटकथा. नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झालेला ‘उलझ’ हा सुधांशू सरिया लिखित, दिग्दर्शित चित्रपटात या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने तो सगळ्याच बाबतीत फसला आहे.

या चित्रपटाचे मुख्य आकर्षण काय आहे? जान्हवी कपूर! श्रीदेवीची ही कन्या. कोणत्याही पात्राचा सखोल अभ्यास करणे, ही खरे तर तिच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. तिला डायलॉग डिलिव्हरी अजूनही जमत नाही. वडील बोनी कपूर चित्रपट निर्माते असल्यामुळे तिला वारंवार चित्रपट मिळत राहतात, पण अभिनयाची बाजू तोकडी असल्यामुळे अंगप्रदर्शन करणे, एवढेच तिच्या हातात आहे. याही चित्रपटात तिने ते इमानेइतबारे केले आहे. पण, या चित्रपटाच्या पटकथेत मुळातच अनेक दोष आहेत. इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये नुकतीच निवड झालेली युवती नियुक्ती झाल्यावर लगेचच लंडनमध्ये कामावर रुजू काय होते.. कामाच्या पहिल्याच दिवशी तिला एक अनोळखी इसम काय भेटतो.. त्या दिवशीची संध्याकाळ ती त्याच्याबरोबर घालवते आणि नंतर त्याच्याच घरी रात्र व्यतित काय करते… त्यामुळे एकूणच काय होऊ शकते, याचा अंदाज आपण अंदाज बांधू शकतो.

मुदलात कोणीही सरकारी अधिकारी लंडनमध्ये नियुक्ती झाल्यावर पहिल्याच दिवशी इतके सगळे उपद्व्याप करू शकेल का? या पदावर नेमणूक होण्यासाठी कोणाही युवकाला किंवा युवतीला कोणत्या लेखी परीक्षांतून जावे लागते, किती मुलाखती द्याव्या लागतात, याची सर्वसाधारण कल्पना पटकथा लेखकाला का असू नये? नसल्यास ती पटकथा एखाद्या इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमधील उच्चपदस्थाकडून तपासून घेण्यासाठी किती कष्ट करावे लागतात? तसे करावे लागल्यास तो चित्रपटकर्त्याच्या कामाचा भाग नव्हे का? परदेशात अशा प्रकारच्या पटकथा लिहिताना त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेतला जातो, तसा अभ्यास करण्याच्या वृत्तीचा अभाव आपल्याकडे का आहे? आणि उच्च निर्मितीमूल्ये असल्यावर सगळे माफ असते का? लंडनमध्ये पहिलीच रात्र अनोळखी व्यक्तीच्या सहवासात घालवताना टेरेसवर तोकड्या पांघरुणात रात्रभर पहुडणे कोणालाही अशक्य आहे. चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शकाने असा शॉट देण्यास सांगितल्यावर सर्वसामान्य लॉजिक वापरून असे प्रश्न हे अभिनेते/अभिनेत्री का विचारत नाहीत?

लंडनमधील फॉरेन सर्व्हिसेसमधील उच्चपदस्थ अधिकारी ‘लगान’ चित्रपटासारखी ब्रिटिश हिंदी कसे बोलतील? चित्रपट लंडनमध्ये घडत असला, तरी परदेशी लोकांबरोबर कोणीही भारतीय इंग्रजीच बोलेल. आज सबटायटलच्या जमान्यात संवाद इंग्रजी आणि सबटायटल्स हिंदीमध्ये असे तंत्र वापरण्याचे कोणालाही का सुचले नाही? कोणत्याही कॉम्प्युटरवरून कोणताही डेटा कोणीही, केव्हाही कॉपी करू शकत नाही. विशेषतः तुम्ही प्रोफेशनल वातावरणात काम करत असाल, तर अगदी छोट्या आयटी कंपन्याही याची काळजी घेतात. तरी फॉरेन सर्व्हिसेसमधील कोणीही कसाही डेटा पेन ड्राइव्हवर घेताना आणि देताना यामध्ये दाखवण्यात आले आहे. सरकारी अधिकारी कोणत्याही परवानगीशिवाय, कोणत्याही देशामध्ये केव्हाही कसे प्रवास करू शकतात, असाही प्रश्न हा चित्रपट पाहताना पडतो.

याच विषयावर आलेला ‘राजी’ हा चित्रपट उत्कृष्ट होता, कारण त्याची पटकथा मेघना गुलजार यांनी विशाल भारद्वाज यांच्या सहाय्याने लिहिली होती. ‘उलझ’ या चित्रपटाचे टेकिंग उत्तम आहे, निर्मितीमूल्ये उच्च दर्जाची आहेत, कारण निर्मात्यांचे पाठबळ आहे. याचाच अर्थ पैसा आहे, पण एकूणच कथा-पटकथेवर काम केलेले नाही, अशी परिस्थिती क्षणाक्षणाला जाणवते. गुलशन देविया, रोशन मॅथ्यू, जितेंद्र जोशी यांची कामगिरी उत्तम आहे. पण, जान्हवी कपूर नसलेले प्रसंग चित्रपटात नाहीत. म्हणजेच कथे-पटकथेपेक्षा कलाकार मोठा असे आधीच मानले गेल्यामुळे चित्रपट उलझ गया हैं..

दिग्दर्शकाला पटकथेविषयी कोणताही प्रश्न न विचारता कलाकारांनी मिळेल ते काम इमाने इतबारे केल्यामुळे चित्रपट बऱ्याच ठिकाणी फसला आहे. आज बॉलीवूडमध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे, उत्तम कलाकारांची फौज आहे, त्यांची मूळ पटकथेवर काम करण्याची इच्छा नाही. दुसरीकडे, उत्तम पटकथा लिहिणारे निर्मात्यांच्या शोधात आहेत. या विरोधाभासात एकूणच हिंदी चित्रपटसृष्टी अडकली आहे. तिला यातून बाहेर काढणार कोण?

(संपर्क- suhass.kirloskar@gmail.com)



Source link