
Ratan Tata Shantani Naidu : रतन टाटा यांचा सर्वात तरुण आणि जिवाभावाचा मित्र आणि त्याहीपेक्षा त्यांच्या उतारवयात त्यांच्यासह सावलीप्रमाणे वावरणाऱ्या शांतनू नायडूनं कायमच सर्वांची मनं जिंकली. टाटा कुठे कार्यक्रमाला पोहोचले किंवा कोणत्या मुलाखतीला, तिथंतिथं हा शांतनू त्यांची साथ देताना दिसला. अगदी या बड्या उद्योजकाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही त्यानं हक्कानं केलं. असा हा शांतनू नायडू टाटांच्या निधनानंतर काय करतोय बरं? सध्या अनेकांच्याच मनात हा प्रश्न घर करत आहे.
शांतनू सध्या काय करतो, कुठं काम करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं खुद्द त्यानंच दिली आहेत. Linkdin च्या माध्यमातून त्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. एका पोस्टच्या माध्यमातून त्यानं आपण नव्या संकल्पनेवर काम करत असल्याचं सांगत मुंबईत सुरु झालेली ही संकल्पना आता थेट जयपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती त्यानं दिली आहे.
शांतनूच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव आहे, ‘बुकीज’. सायलेंट रिडींग, अर्थात अतिशय शांतपणे वाचन करण्याचा एक कमाल प्रयोग त्याच्या या प्रोजेक्टअंतर्गत पार पडतो. इथं कैक अनोळखी व्यक्ती एका शांत, निसर्गरम्य ठिकाणी भेटतात आणि तिथं कमालीच्या शांततेत पुस्तकं वाचतात, किंबहुना पुस्तकांना नव्यानं भेटतात. मुंबईत सुरु झालेल्या त्याच्या या संकल्पनेनं आतापर्यंत बंगळुरू आणि पुण्यापर्यंत मजल मारली असून, आता पुढचा टप्पा आहे जयपूर. टाटांच्या मार्गदर्शनानं शांतनूनं जयपूरही गाठलं असून, इथंही त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असा मानस आहे.
पुणे आणि बंगळुरू इथं शांतनूच्या या प्रोजेक्टची चर्चा सुरू असून, आता येत्या काळात तो दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, सूरत इथंही या योजनेचा विस्तार करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर त्याच्या या संकल्पनेला कमाल प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय Good Fellows या संस्थेच्या माध्यमातूनही शांतनू ज्येष्ठांना आपुलकीचा आधार देताना दिसत आहे. साचेबद्ध व्यवसायांना शह देत नवनवीन संकल्पना हाताळण्याची त्याची ही ओढ त्याचं वेगळेपण सिद्ध करताना दिसत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
‘बुकीज या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी शांतनूची सुरू असणारी धडपड ही कायमच त्या मूल्यांवर उजेड टाकते जी मूल्य तो टाटांच्या सानिध्ध्यात असताना शिकला. रतन टाटा यांनी शांतनूवर कमालीचा प्रभाव पाडत समाजा व्यक्ती म्हणून जबाबदारीनं वावरण्याची जाणीव आणि समाजाप्रती आपलं देणं, कृतज्ञतेचा भाव या गोष्टींची शिकवण त्याच्या मनावर बिंबवत गेली हेच खरं.








