माझ्या हिश्श्याचे किस्से: ज्या कपड्यांमुळे करिश्माने चित्रपट सोडला, तेच घालण्यासाठी राजी झाली होती दिव्या

0
18
माझ्या हिश्श्याचे किस्से: ज्या कपड्यांमुळे करिश्माने चित्रपट सोडला, तेच घालण्यासाठी राजी झाली होती दिव्या


रुमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘रंग’ चित्रपटातील एका दृश्यात दिव्या भारती.

तलत जानी तसे रोजच माझ्या घरी यायचे. त्यांच्यासोबत दिव्याची चेष्टामस्करी चालायची. तलतकडे पाहत ती हसून म्हणाली, ‘तुमचे डोळे तर दिसत नाहीत, तुम्ही शॉट कसा घेणार?’ मग बोलली, ‘ठीक आहे! मी करेन हा चित्रपट. रूमी भाईने सांगितलंय आणि कथाही मी रूमी भाईकडून ऐकून घेईन. आणि तुम्ही करिश्मासाठी कपडे बनवलेत ना? मग ते कपडे द्या. मी तेच कपडे घालेन…’

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज एक असा किस्सा सांगणार आहे, जो सांगण्यापूर्वीच माझे अंत:करण जड झाले आहे, मनात एक विचित्र अस्वस्थता आहे. कोण्या एका व्यक्तीच्या मोठेपणाच्या, चांगुलपणाच्या, आपुलकी आणि नातेसंबंध निभावण्याच्या गुणाबद्दल मनात एक वेगळी भावना दाटली आहे. चार दिवसांपूर्वी रक्षाबंधन होते आणि रक्षाबंधनाला मी माझी बहीण दिव्या भारतीला खूप मिस करत होतो. १९९१ ची गोष्ट आहे. मी लिहिलेला “रंग’ हा चित्रपट सुरू झाला होता. पहिले शेड्यूल गाण्याचे ठेवले होते. गाणे होते.. “हम तुम पिक्चर देख रहे हों किसी पिक्चर थिएटर के अंदर, और बिजली चली जाय..’ बॉबी चित्रपटातील “हम तुम एक कमरे में बंद हो..’ या गाण्यावरून प्रेरणा घेऊन हे गाणे बनवण्यात आले होते. चित्रपटाच्या मुहूर्तासाठी फिल्मालय स्टुडिओमध्ये तीन सेट लावण्यात आले होते. एक प्लेनचा, एक ट्रेनचा आणि तिसरा बॉबीची ती खोली, ज्यात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया राहत होते. हुबेहूब तोच सेट लावला होता. त्या वेळी चित्रपटात दोन नायिका होत्या- करिश्मा कपूर आणि चांदनी. नायक होता कमल सदाना आणि महत्त्वाच्या भूमिकेत जितेंद्र आणि अमृता सिंह होत्या. करिश्मा कपूरचा िदग्दर्शक तलत जानी यांच्यासोबत कपड्यांबाबत प्रॉब्लेम सुरू होता. तलत जानी यांना कपडे त्यांच्या पत्नीकडून तयार करून घ्यायचे होते आणि करिश्माची इच्छा होती की, तिच्या डिझायनरने कपडे बनवावे. मी तलत यांना समजावलं, ‘तलत, कपड्यांचा निर्णय नायिकेच्या डिझायनवर सोडला तर बरे होईल, कारण ते तिच्यासाठी कम्फर्टेबल असूू शकेल.’ पण, तलत जानी यांनी आपल्या पत्नीकडून कपडे बनवून घेतले.

असो. एके दिवशी मी घरी असताना निर्माता मन्सूर सिद्दिकी यांचा माणूस आला आणि म्हणाला, “तुम्हाला लगेच ऑफिसमध्ये बोलावलंय.’ मला वाटलं, काय झालं असावं? मी पटकन कपडे बदलले आणि निघालो. मन्सूर यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो तर तिथे मन्सूर आणि तलत जानी बसले होते. दोघे खूप टेन्शनमध्ये दिसत होते. मी विचारलं, “काय झालं?’ तर म्हणाले, “करिश्माने चित्रपट सोडलाय..’ मन्सूर म्हणाले, “रूमी, सुरुवातीलाच नुकसान होईल. पहिलाच चित्रपट आहे माझा, पुढे चित्रपट कसा बनणार? तीन-तीन सेट लागले आहेत, सर्वांच्या तारखा मिळाल्या आहेत.’ मी विचारलं, “सांगा, मी काय करू शकतो? तर म्हणाले, “तू दिव्याशी बोल आणि कसंही करून तिला हा चित्रपट करायला सांग.’ मी म्हणालो, “हे बघा, मी कधीही कामात वैयक्तिक संबंध आणत नाही.’ मन्सूर, तलत म्हणाले, “भाई, हा आमच्या करिअरचा प्रश्न आहे. काहीतरी करावं लागेल.’ त्या वेळी मोबाइल नव्हते. मी दिव्याचा सेक्रेटरी जतीन राजगुरूला त्यांच्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि त्यांना, “दिव्या कुठं आहे?’ असं विचारलं. जतीन म्हणाले की, त्या डेंटिस्टकडे गेल्या आहेत. मी म्हणालो, ‘ठीक आहे, तिला सांगा, माझा फोन होता. तिच्याकडे काही काम आहे.’ जतीनने विचारलं, “कुठून बोलताय?’ मी सांगितलं, ‘मन्सूर यांच्या ऑफिसमधून बोलताेय.’ मग फोन ठेवून दिला. मन्सूर, मी आणि तलत तणावात तिथेच बसलो होतो. साधारण एक-दीड तासानंतर मन्सूरच्या सेक्रेटरी त्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, “रूमीजी, तुमच्यासाठी दिव्या भारतींचा फोन आहे.’ आणि तिने फोन आत ट्रान्सफर केला. मी फोन उचलतोय तोवर मन्सूर आणि तलत एक्साइटमेंटने उभे झाले होते आणि मला खुणेनेे सांगत होते की, तिला लगेच बोलावून घे.

दिव्याने विचारले, “रूमी भाई, काय झाले?’ तिला चिंता वाटली. कारण त्या काळात दिव्या भारती माझ्याच घरी राहत होती. त्यामुळे ज्या व्यक्तीसोबत आपण राहतो तीच आपल्याला शोधतेय ही काळजी करण्यासारखीच गोष्ट होती. मी म्हणालो, अशी काही खास गोष्ट नाही, तू घरी पोहोच. मी घरी येऊन तुझ्याशी बोलतो.’ मग मी, तलत आणि मन्सूर लगेच घरी पोहोचलो. दिव्या आली आणि तिनं, ‘काय झालं?’ असं विचारलं. मी तिला स्पष्टपणे सांगून टाकलं की, करिश्माने हा चित्रपट सोडला आहे आणि तुला तो करावा लागेल. आधी ती हसली. कारण तलत जानी तसे रोजच माझ्या घरी यायचे. तलतसोबत तिची चेष्टामस्करी चालायची. कारण तलतचे केस अर्ध्या चेहऱ्यावर पसरलेले असायचे. ती हसून म्हणाली, ‘तुमचे डोळे तर दिसत नाहीत, तुम्ही शॉट कसा घेणार?’ मग बोलली, ‘ठीक आहे! मी करेन हा चित्रपट. रूमी भाईने सांगितले आहे आणि कथादेखील मी रूमी भाईकडून ऐकून घेईन. आणि तुम्ही करिश्मासाठी कपडे बनवलेत ना? मग ते कपडे द्या. मी तेच कपडे घालेन.’ जरा विचार करा, याच कपड्यांमुळे करिश्मा कपूरने चित्रपट सोडला आणि दिव्या भारती तेच कपडे घालायला तयारी झाली. नंतर म्हणाली, ‘रूमी भाई, माझ्या तारखाच शिल्लक नाहीत, मग शूटिंग कसं करणार?’ मी म्हणालो, “मला माहितीय तुला झाेप येत नाही. रात्री शूटिंग करून हा सेट कम्प्लिट कर, नंतर पुढचं बघू.’ मग तिनं रात्री शूटिंग करून ते पूर्णही केले. कोणत्याही अभिनेत्रीकडून, विशेषत: दोन अभिनेत्री असतील तर त्यांच्याकडून चित्रपट करून घेणं किती कठीण असतं हे मी जाणून आहे. हा दिव्याचा त्या चित्रपटावर, मन्सूरवर, तलतवर आणि माझ्यावर खूप मोठा उपकार आहे. अकबर इलाहबादींचा एक शेर आहे…

ये है कि झुकाता है मुख़ालिफ़ कि भी गर्दन
सुन लो कि कोई शय नहीं एहसान से बेहतर।

दिव्याचे तर इतके किस्से आहेत की त्यासाठी मला एक पुस्तकच लिहावं लागेल. तूर्तास इतकेच.. दिव्या भारतीच्या “रंग’मधील हे गाणे ऐका..

हम तुम पिक्चर देख रहे हों किसी थिएटर के अंदर…
और बिजली चली जाए, अंधेरा ही अंधेरा हो।

स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.



Source link