माझ्या हिश्श्याचे किस्से: टाटांनी केली होती ‘ऐतबार’ची निर्मिती; सीबीएस इंडियाच्या पहिल्या अल्बमसाठी पॉप स्टार जोहेबला केले होते साइन

0
1
माझ्या हिश्श्याचे किस्से:  टाटांनी केली होती ‘ऐतबार’ची निर्मिती; सीबीएस इंडियाच्या पहिल्या अल्बमसाठी पॉप स्टार जोहेबला केले होते साइन


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘ऐतबार’ सिनेमाची रतन टाटा यांनी 2004 मध्ये निर्मिती केली होती.

अलीकडेच या संपूर्ण देशाला अशा धक्क्यातून जावे लागले, ज्याविषयी बोलतानाही मन जड होत आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतनजी नवल टाटा यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. म्हणून माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज रतनजी टाटा यांच्याबद्दल सांगणार आहे.

या देशातील प्रत्येक नागरिकाप्रमाणे मलाही रतनजी टाटा यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. आपल्या चांगल्या स्वभावाने आणि उद्योगातील कौशल्याने त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रियता मिळवली होती. टाटा समूहाच्या विविध व्यवसायांबद्दल सर्वांना माहिती असली, तरी फार कमी लोकांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे रतन टाटा यांनी २००४ मध्ये ‘ऐतबार’ नावाच्या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांची प्रमुख भूमिका होती. तो सिनेमा फारसा न चालल्याने टाटांचे खूप नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी त्या सिनेमानंतर फिल्म इंडस्ट्री सोडली.

तथापि, रतन टाटाजींना संगीत आणि कलेची आवड होती. म्हणूनच त्यांनी सीबीएस इंडिया नावाची म्युझिक कंपनी सुरू केली होती. आपल्या या म्युझिक कंपनीच्या पहिल्या अल्बमसाठी त्यांनी पाकिस्तानी पॉप स्टार जोहेब हसन आणि त्यांची बहीण नाझिया हसन यांना साइन केले होते. जोहेब हसन यांचे ‘डिस्को दीवाने’ हे गाणे खूप हिट झाले होते. त्यांच्यातील टॅलेंट लक्षात घेऊन रतन टाटांनी जोहेबना विम्बल्डनमधील त्यांच्या घरी कॉल केला.

जोहेबच्या आईने कॉल उचलला. रतन टाटाजी त्यांना म्हणाले, ‘मी भारतातून रतन बोलतो आहे. मी एक म्युझिक कंपनी सुरू करणार आहे आणि मला असे वाटते की, माझ्या म्युझिक कंपनीचा पहिला अल्बम जोहेबच्या आवाजातला असावा.’ जोहेब सांगतात की, त्यानंतर रतन टाटाजींसोबत त्यांचे बऱ्याचदा बोलणे झाले. पण, त्यांच्या बोलण्यातून आणि साधेपणामुळे ते खरोखर कोण आहेत, याची मला कल्पना आली नाही.

आमच्याच संवाद सुरू झाला आणि वाढत गेला. नंतर सीबीएस इंडियाचा पहिला म्युझिक अल्बम ‘यंग तरंग’ लाँच झाला. या लाँचिंगनंतर संपूर्ण भारतात आणि दक्षिण आशियात म्युझिक अल्बमचा प्रारंभ झाला. ‘यंग तरंग’च्या यशाने ‘डिस्को दीवाने’च्या यशालाही मागे टाकले. त्यावेळी अमेरिकेत एम टीव्ही नुकताच सुरू झाला होता. या वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी ‘यंग तरंग’ची गाणी ऐकून आम्हाला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. दूरदर्शनने भारतात या अल्बमचे संगीत व्हिडिओ प्रसारित केले.

जोहेबने सांगितले की, ‘१९८४ ला मुंबईत हॉटेल ताजमध्ये यंग तरंग’चे लाँचिंग झाले. त्या दिवशी रतनजी टाटा कोण आहेत, हे मला समजले. एवढे महान व्यक्तिमत्त्व इतक्या साधेपणाने आणि सतत चेहऱ्यावर हसू घेऊन जगू शकते, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. टाटाजींच्या या साधेपणावरुन एक प्रसिद्ध शेर आठवतोय…

चाल वो चल की पस- ऐ-मर्ग तुझे याद करें,

काम वो कर की ज़माने में तेरा नाम रहे।

जोहेबने सांगितले की, ‘यंग तरंग’ अल्बम लाँच झाल्यावर रतन टाटाजींनी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. मी आणि माझी बहीण नाझियाने होकार दिला. टाटाजींच्या घरी जाण्यापूर्वी आमच्या मनात हजारो विचार चालू होते. आम्ही पुन्हा पुन्हा विचार करत होतो की, भारतातील सर्वात मोठ्या श्रीमंत व्यक्तींपैकी हे एक आहेत, त्यांचे संपूर्ण जगभरात इतके मोठे नाव आहे. त्यांचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नसेल. तिथे नोकरांच्या लांबच्या लांब रांगा असतील, मोठ्या थाटामाटात ही असामी राहात असेल. पण विश्वास ठेवा, भारतातील सर्वांत ख्यातनाम श्रीमंतापैकी एक असलेले रतनजी टाटा एका सामान्य २ बीएचके फ्लॅटमध्ये राहात होते. त्या फ्लॅटमध्ये त्यांच्यासोबत त्यांची बहीण, एक नोकर आणि एक अल्सेशियन कुत्रा होता. त्यावेळी त्या व्यक्तीचा साधेपणा पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आज एखाद्याला थोडेफार यश मिळाले तरी तो गर्विष्ठ बनतो. पण, माझ्यासमोर मात्र रतनजी टाटा यांचे हे अनोखे उदाहरण होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके मोठे असूनही त्यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले आणि आमच्यावर कुटुंबातील सदस्यांसारखे प्रेम केले.

तर मित्रांनो, असे होते रतनजी टाटा. शेवटी मला माझ्या बालपणातील एक विनोद आठवतोय. १९७० च्या दशकातील ही गोष्ट आहे. एक ब्रिटिश प्रवासी एअर इंडियातून भारतात आला. त्याने विचारले की, हे विमान कोणाचे आहे? कोणीतरी सांगितले, ‘टाटांचे.’ विमानतळावर उतरल्यावर विचारले की, हे विमानतळ कोणाचे आहे? कोणीतरी म्हणाले, ‘टाटांचे.’ गाडीत बसून निघाला. त्याला गाडी खूप आवडली. त्याने चालकाला विचारले की, ही गाडी कोण बनवतो? उत्तर आले, ‘टाटा.’ हा प्रवासी हायवेवरून जात होता. त्याला एक ट्रक दिसला आणि त्याने विचारले, खूप छान ट्रक आहे, ते कोण बनवतो? त्याला कोणीतरी सांगितले, ‘टाटा.’ ड्रायव्हरने त्याला विचारले, कुठे जायचेय? हा प्रवासी म्हणाला, मुंबईतील सर्वोत्तम हॉटेलमध्ये घेऊन चल.. ड्रायव्हर त्याला ताजमहाल हॉटेलमध्ये घेऊन गेला. तो हॉटेलजवळ पोहोचला, हॉटेल पाहिलं आणि म्हणाला, ‘वा! काय हॉटेल आहे! कोणाचं आहे हे हॉटेल?’ कोणीतरी सांगितलं.. ‘टाटांचं’. हॉटेलात त्याला वेलकम चहा देण्यात आला, त्याने एक घोट घेतला नि म्हणाला. ‘वा! काय चहा आहे! कोण बनवतो?’ कोणीतरी म्हणाले.. ‘टाटा.’ तो खोलीत आला. त्याने एसी चालू करताच खोली थंड झाली. त्यानं पुन्हा विचारलं, ‘छान.. हा एसी कोण बनवतो?’ वेटरने सांगितले, ‘टाटा.’ तो अंघोळीला गेला. तिथला साबण त्याला खूप आवडला. त्याने बाहेर आल्यावर विचारलं, की हे साबण कोण तयार करतो? वेटरने उत्तर दिले.. ‘टाटा’. तो ब्रिटिश प्रवासी म्हणाला, या देशाचे नाव इंडिया का आहे? खरं तर याचे नाव ‘टाटा’ असायला हवे होते…

हा विनोद १९७० च्या दशकातला आहे, पण वास्तवात टाटांचे आपल्या रोजच्या आयुष्यात खूप मोठे योगदान आहे. टाटा ही एकच कंपनी आहे, जिच्याबद्दल आपण अभिमानाने सांगू शकतो की, हो, आम्ही टाटाचं मीठ खाल्लं आहे! आज रतनजी टाटा यांच्या आठवणीत राजेश खन्ना यांच्या ‘आराधना’तील त्यांच्या आवडीचं गाणं ऐका…

मेरे सपनों की रानी कब आएगी तू,

आयी रुत मस्तानी कब आएगी तू…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link