महाराष्ट्रातील शेतकरी, श्रमिक वर्गाची निराशा करणारा अर्थसंकल्प- माकपची टीका

0
2
महाराष्ट्रातील शेतकरी, श्रमिक वर्गाची निराशा करणारा अर्थसंकल्प- माकपची टीका


अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि श्रमिक वर्गाची अत्यंत निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल व सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देऊन सोयाबीनचा दाणा न दाणा खरेदी केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. किसान सन्मान योजनेच्या अनुदानात ३ हजारांची वाढ केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोसळणाऱ्या दरांचा वारंवार सामना करावा लागतो. दीर्घकालीन उपाय करून दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान रास्त भावाची हमी देण्यासाठी धोरणे घेतली जातील असे आश्वासनही सरकारने वारंवार दिलेले होते. अर्थसंकल्पामध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे, असं नवले म्हणाले. ६,०६,८५५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला केवळ ९,७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत. एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा खर्च केवळ १.६ टक्के इतका अल्प आहे. देशभरात कृषी अरिष्टामुळे सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या ज्या राज्यात होतात त्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाची झालेली ही अशी अवहेलना संतापजनक आहे.



Source link