गोष्ट सांगतो ऐका…: लाल दिवा

0
1
गोष्ट सांगतो ऐका…:  लाल दिवा


अरविंद जगताप6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शेवटी खूप दिवस रखडलेला निकाल लागला. धनंजय पुन्हा पास झाला होता. मेन्स सुद्धा. मुलाखतही! आता नियुक्ती. बातमी ऐकून सगळं गाव खुश झालं…

धनंजय दहावीत कसाबसा पास झाला. खरं तर नापास झाला असता, तरी त्याला एवढं दु:ख झालं नसतं, जेवढं दु:ख पस्तीस टक्के मिळवून काठावर पास झाल्याचं झालं. सगळीकडं चर्चा झाली. बातमी पण आली एका ठिकाणी. धनंजय खजील झाला होता. त्यानंतर त्यानं मन लाऊन अभ्यास केला. ठरवून कला शाखेत गेला.

स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पुण्यात जायचं होतं. पण, नेमकं बहिणीचं लग्न आलं. तरी घरच्यांनी हार मानली नाही. कर्ज काढून पैसे दिले. धनंजय पुण्यात गेला. सुरूवातीला खूप अवघड जात होतं सगळं. गावात असताना कधी पेपर वाचला नव्हता. कधी इंग्रजी काही वाचायचा विषयच नव्हता.

आता पश्चात्ताप होत होता. पण, माघार घेऊन चालणार नव्हतं. तयारी करत राहिला. पहिल्याच प्रयत्नात प्री पास झाला. आईबापाला मूठभर मांस वाढल्यासारखं वाटलं. मेन्स पास झाल्यासारखा सोहळा झाला. दहा-बारा नातेवाईक आवर्जून घरी आले. मटण बनलं. धनंजयच्या घरच्यांशी गावातले लोक बरे वागू लागले. उद्या मोठा अधिकारी होणार, तर संबंध बरे पाहिजेत. हळूहळू लोक धनंजयला ‘साहेब’ म्हणू लागले.

कधी गावाकडं आला, तर आवर्जून घरी बोलावू लागले. काहींनी मुली दाखवल्या नात्यातल्या. पण, मुख्य परीक्षा बाकी होत्या. धनंजय सांगायचा, ‘अजून वेळ आहे, अधिकारी झाल्याशिवाय बाकी काही विचार करणार नाहीय.’ त्याचं एकच स्वप्न होतं.. लाल दिवा.

लहानपणापासून धनंजयला लाल दिव्याचं आकर्षण. त्याचे वडील शेतकरी चळवळीत होते. एकदा असंच काही तरी आंदोलन होतं. पोलिसांची गाडी आली. अधिकारी रुबाबात उतरला. लोकांना अटक करायचे आदेश दिले. मोठ्या गाडीत लोक भरून नेले. धनंजयचे वडील पण होते त्यात.

दहा – बारा दिवसांनी वडील आले. त्यांना वाटलं, नेहमीप्रमाणे धनंजय धावत येईल; पण तो आला नाही. नाराज झाला होता. का या मोर्चाच्या भानगडीत पडता? सोडून द्या शेती, म्हणत होता. वडील म्हणाले, नाही कोणत्या भानगडीत पडत. पण, तू अधिकारी हो. मोठा अधिकारी. मग गरज पडणार नाही. सगळी कामं चांगली होतील.

मोर्चे काढायचे काम पडणार नाही. लहान वयात धनंजयला ते सोपं वाटलं. आवडलं. त्यानं आनंदानं होकार दिला. मग लाल दिव्याची गाडी दिसली की बापलेकाला उगाच आनंद व्हायचा. स्वप्न जगतच होते दोघं. आणि आता ते स्वप्न खरं व्हायची वेळ आली होती. पण, ती जवळ नव्हती. खूप महिने परीक्षाच झाली नाही. झाली तर धनंजय मेन्समध्ये थोडक्यात मागे पडला, पण खचला नाही.

पुन्हा तयारीला लागला. म्हणता म्हणता तीन वर्षे झाली. धनंजय लवकरच अधिकारी होईल, या आशेवर कर्ज देणारे लोक शांत होते. पण, आता त्यांचा तगादा सुरू झाला. नवीन कर्ज मिळण्याची शक्यता नव्हती. कधी नव्हे ते तोंड लपवयची वेळ येऊ लागली बापावर. पण, वाट बघण्याशिवाय हातात काही नव्हतं. आणि वाट बघण्याची सवय शेतकऱ्याएवढी कुणालाच नसते.

धनंजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. हळूहळू त्यानं छोटं-मोठं काम करून स्वतःचा खर्च भागवायला सुरूवात केली. घरी पैसे पाठवायचं स्वप्न बघणारा धनंजय स्वतःचा खर्च भागवता भागवता मेटाकुटीला येत होता. पण, हिंमत हरला नव्हता. अभ्यास करत होता. धडधाकट दिसणारा धनंजय हळूहळू अगदीच खंगत चालला.

परीक्षा दिली होती. मेहनत केली होती, पण पुढं काही हालचाल नव्हती. वाट बघण्यात महिने निघून गेले. घरचे सारखे फोन करायचे. उत्तर नव्हतं. बाप कर्जवाल्यांना कंटाळून गेला होता. शेवटी दोन एकरातली एक एकर विकावी लागली. शेवटी खूप दिवस रखडलेला निकाल लागला. धनंजय पुन्हा पास झाला होता. मेन्स सुद्धा. मुलाखतही! आता नियुक्ती. बातमी ऐकून सगळं गाव खुश झालं. पोरानं आईबापाच्या कष्टाचं चीज केलं.

कर्जासाठी तगादा लावणारे, शिवीगाळ करणारे प्रेमाने बोलायला लागले. आजवर दयेने आणि चेष्टेने बघणारे आता धनंजयच्या आईबापाकडं कौतुकानं बघू लागले. पण, हे सगळं किती दिवस चालणार होतं? लोक येता-जाता एकच विचारायचे, ‘कुठं पोस्ट मिळाली?’ पण, अजून पोस्ट निघतच नव्हती. कुणी तरी कोर्टात गेलं होतं, म्हणून कारण झालं. पोस्ट निघायला एक वर्ष लागलं. धनंजय रोज मंत्रालयात फोन करायचा. ओळखीच्या अधिकारी लोकांना भेटायचा. पण, कुठून काही उत्तर येत नव्हतं.

धनंजय खचला होता. आईवडील तर रडकुंडीला आले होते. त्यांनी त्यांना जे समजत होतं ते केलं. देवाला नवस केला. पूजा मांडली. पत्रिका दाखवली. ज्योतिषी म्हणायचा, ‘पुढच्या महिन्यात काम होईल.’ पण, त्यानं म्हणून काय होणार होतं? सरकार काहीच म्हणत नव्हतं. कोर्टाला वेळ मिळत नव्हता. दुसरं वर्ष पण संपलं. धनंजयने दुसरी कुठली परीक्षाही दिली नव्हती. पोटापाण्यासाठी वाटेल ते करण्यातही जीव रमत नव्हता.

एका अधिकाऱ्याने धनंजय आणि त्याच्यासारख्या पोस्ट अडकलेल्या चार – पाच जणांची मंत्री महोदयांशी भेट करून दिली. दोन मुलं तर मंत्र्यांच्या मतदासंघांतलीच होती. त्यांनी मनावर घेतलं. पोरांना सोबत घेऊन फिरले. एका महिन्यात पोस्ट निघेल, असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. दिवस जात राहिले. आणि एक दिवस सरकार पडलं. विरोधक सत्तेवर आले. आता मंत्री महोदय तरी काय करणार होते? त्यांचाच लाल दिवा गेला होता.

आईवडील डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते. धनंजयला सुद्धा गावाकडं लाल दिव्याच्या गाडीत जायची घाई होती. पण, मार्ग दिसत नव्हता. खचलेला माणूस एक ना एक दिवस मार्ग शोधतोच. तो चांगला की वाईट, याचा विचार अनेकदा त्याच्या डोक्यात येत नाही. तो मार्ग धनंजयनेही निवडला. लाल दिव्याच्या गाडीत गावी गेला. आईवडील अन् सगळं गाव गोळा झालं. धनंजयची बॉडी आली होती. अॅम्ब्युलन्स नावाच्या लालदिव्याच्या गाडीत…

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link