
अरविंद जगताप9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
खरं तर डॉक्टर विशाखाला खूप वेळ हेच समजवत राहिले की, ती जी कोण बाई असेल, तू तिचा का विचार करतेयस? तू जीव दिल्यावर ती तर तुझ्या नवऱ्यासोबत संसार करायला मोकळीच होईल. विशाखा म्हणाली, ‘मग मी काय करायला पाहिजे?’ डॉक्टर म्हणाले, ‘माणसं असंच वागतात, हे समजून घेतलं पाहिजे.’ विशाखाला संतापच आला. कसं समजून घ्यायचं? आणि का म्हणून समजून घ्यायचं?
विशाखा आता डॉक्टर प्रज्योतसमोर बसलीय. संध्याकाळचे सात वाजत आलेत. ती काल आत्महत्या करणार होती. संध्याकाळी सातची वेळ असेल. तिनं ठरवून टाकलं होतं. अगदी पाच मिनिटांत. तिचा नवरा संदेश दुपारीच बिअर पीत बसला होता क्रिकेट बघत. रविवारी त्याचा हा आवडता उद्योग. त्यात क्रिकेट असल्यावर आपण किती पितोय, याचंही त्याला भान राहात नाही. चार बिअर पिऊन झोपला. विशाखाला काहीच उद्योग नव्हता. फोनवर वीस – पंचवीस रील बघून कंटाळा आला होता तिला. शेजारीच संदेशचा फोन होता. विशाखाने फोन उचलला सहज कुतूहल म्हणून. फोन लॉक होता. तिनं तो संदेशच्या चेहऱ्यासमोर धरला. फोन उघडला. विशाखा फोन बघू लागली. तिला संदेश आणि स्वातीचं चॅटिंग दिसलं. काही फोटोही होते. विशाखा हैराण झाली. स्वाती तिची मैत्रीण. खूपदा घरी यायची. एक – दोनदा स्वातीचा नवरा, स्वाती आणि संदेश, विशाखा फिरायलाही गेले होते. पण, त्यावेळी स्वाती आणि संदेश एकमेकांशी फार बोलले नाहीत. दोघांचं असं काही चालू असेल, असा संशयही विशाखाला आला नाही. कधीच. आणि आज मोबाइलमध्ये थेट पुरावाच समोर होता. आपली मैत्रीण असं वागेल, असा तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता. खरं तर त्या क्षणी नवऱ्याचा जास्त राग येत होता का स्वातीचा, हे तिचं तिलाच सांगता आलं नसतं. आताही डॉक्टरांना सांगताना तिला नेमका कुणाचा जास्त राग आलाय, हे ठरवता येत नव्हतं. त्या क्षणी संदेशच्या थोबाडीत ठेवून द्यायची इच्छा झाली होती. स्वातीला फोन करून शिव्या द्याव्या, असंही वाटलं. पण, त्या सगळ्या गोष्टींचा काहीच फायदा नाही, असं तिचं तिनेच स्वतःला समजावलं. दुसऱ्या खोलीत जाऊन एकटीच रडत बसली. आजवर घडलेली प्रत्येक गोष्ट आधी आईला सांगायची तिची सवय. संदेश आवडला ते असो, संदेशने लग्नाबद्दल विचारलं ते असो; सगळ्या गोष्टी तिनं आधी आईशी शेअर केल्या होत्या. पण, आता ही गोष्ट आईला सांगायची तिची हिंमत झाली नाही. ती एकटीच बसून राहिली. आपली एवढी प्रचंड फसवणूक झाली ही गोष्ट काही तिला सहन होत नव्हती. अचानक एका क्षणी तिला जगण्यात काही अर्थ नाही असं वाटू लागलं. आणि तिनं आत्महत्या करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करायला सुरूवात केली. डॉक्टरांनी विशाखाची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली. डॉक्टर प्रज्योत अतिशय बुद्धिमान. डिप्रेशन, आत्महत्येचा विचार येणारे पेशंट त्यांच्यासाठी नवे नव्हते. त्यांनी तिला नीट समजवून सांगायला सुरूवात केली. आधी नेहमीप्रमाणे तिला बोलू दिलं. खूप बोलू दिलं. संदेशबद्दल त्यांना थोडी माहिती होती; पण आणखी खोलात जाऊन चौकशी सुरू केली. विशाखाची मैत्रीण संदेशला पहिल्यांदा कुठे भेटली वगैरे चौकशी केली. विशाखाने स्वातीचा उल्लेख केला नाही. तिचं नाव घ्यायची पण तिची इच्छा नव्हती. पण, डॉक्टर प्रत्येक गोष्ट शांतपणे विचारत राहिले. विशाखाला अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. ती वारंवार डॉक्टरांना विचारत राहिली की, हे माझ्यासोबतच का व्हावं? डॉक्टर तिला म्हणाले की, हे जगात तुझ्या एकटीसोबत झालंय असं नाही. पण तरीही, विशाखाचं एकच म्हणणं होतं, ‘माझ्यासोबतच का?’ डॉक्टर तिला म्हणाले, ‘नवरा – बायकोचं नातं कधी ना कधी जुनं होतंच. मुख्य म्हणजे, हे एकमेव असं नातं आहे ज्यात मनाएवढाच शरीराचा वाटा महत्त्वाचा आहे. बाकी नाती केवळ आणि केवळ मनाने जोडलेली असतात. पण, नवरा – बायकोचं तसं नसतं. लग्न ठरवताना मुलगा – मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. स्त्री आणि पुरुषाने निवडलेलं नातं असतं लग्न. त्या क्षणाला दिसणाऱ्या पुरुषाकडे बघून, त्या क्षणाला बोलणाऱ्या स्त्रीकडे बघून ठरवलेलं असतं की, सगळं आयुष्य एकत्र घालवायचं. तो क्षण कायम कसा राहणार? माणूस बदलत जातो. काही लोक प्रेमळ होत जातात. काही खूप विश्वासू होत जातात. काही धोकादायक होत जातात..’ विशाखा काही वेळ ऐकत राहिली. पण, तिचा प्रश्न तोच होता. तिने काय चूक केली होती? आणि ती दिसायला काय कमी सुंदर नव्हती. बरं तिचं आणि संदेशचं भांडण व्हायचं, असंही नव्हतं. मग असं का झालं? डॉक्टरांना तिचा राग समजत होता. पण, आत्महत्येचा विचार करण्याएवढं टोकाला जाण्याची गरज आहे, असं वाटत नव्हतं. खरं तर डॉक्टर तिला खूप वेळ हेच समजवत राहिले की, ती जी कोण बाई असेल, तू तिचा का विचार करतेयस? तू जीव दिल्यावर ती तर तुझ्या नवऱ्यासोबत संसार करायला मोकळीच होईल. विशाखा म्हणाली, ‘मग मी काय करायला पाहिजे?’ डॉक्टर म्हणाले, ‘माणसं असंच वागतात, हे समजून घेतलं पाहिजे.’ विशाखाला संतापच आला. कसं समजून घ्यायचं? आणि का म्हणून समजून घ्यायचं? डॉक्टर तिला म्हणाले, ‘समजून घ्यायचं म्हणजे माफ करायचं असं नाही. किंवा जे आहे ते चालू द्या, अशी परवानगी नाही. ही गोष्ट बंद कशी होईल, याचा विचार केला पाहिजे.’ विशाखा म्हणाली, ‘जरी समजा त्यांचं प्रकरण बंद झालं तरी मी कसा संसार करू? मी कशी संदेशला माफ करू? एवढी फसवणूक होऊनही?’ डॉक्टर म्हणाले, ‘हा आयुष्याचा प्रश्न आहे. विसरावं लागेल. तोडगा काढावा लागेल. संदेश यातून बाहेर कसा पडेल हे बघावं लागेल..’ डॉक्टर बोलत असताना अचानक विशाखा रडू लागली. खूप वेळ ती रडतच राहिली. काही वेळाने डॉक्टर म्हणाले, ‘मला सांग, तुला संदेशसोबत राहायचंय ना?’ विशाखा म्हणाली, ‘मी संदेशशिवाय राहू शकेन की नाही माहीत नाही. पण, संदेशसोबत तर नक्कीच राहू शकणार नाही आता. त्यानं मला फसवलं, विश्वासघात केला, हीच गोष्ट सतत डोक्यात येत राहील. मला जगायचीच इच्छा नाही.’ डॉक्टर म्हणाले, ‘आत्महत्या हा काही उपाय नाही. तुझ्यासारख्या स्त्रीकडून ही अपेक्षा नाही. तू स्वतःच्या पायावर उभी आहेस. तुझ्यापुढं आख्ख आयुष्य आहे. करिअर आहे. आर्किटेक्ट म्हणून आता एवढी चांगली कामं येताहेत. आत्महत्या करणारी माणसं भित्री असतात. अवलंबून असतात. तू पुढचा विचार कर..’ डॉक्टर खूप वेळ बोलत राहिले. विशाखाचं कौतुक करत राहिले. विशाखा म्हणाली, ‘डॉक्टर बोलणं सोपं असतं. पण, तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्हीपण शांत राहिला नसता.’ डॉक्टर म्हणाले, ‘असं काही नाही. मी कोरडा उपदेश करत नाही. मी तुझ्या जागी असतो तरी मी समजून घेतलं असतं.’ विशाखा विचित्र हसली. ते भयंकर वाटलं डॉक्टरांना. त्यांनी विचारलं, ‘काय झालं हसायला?’ विशाखा म्हणाली, ‘संदेशचं माझ्या ज्या मैत्रिणीसोबत अफेअर आहे म्हणून सांगतेय, ती स्वाती आहे. तुमची बायको. मगापासून मुद्दाम तिचं नाव घेणं टाळत होते. आता सांगा, मी काय केलं पाहिजे?’ डॉक्टर खूप वेळ शांत बसले. विशाखाही.
jarvindas30@gmail.com







