
हेमकिरण पत्की33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
छांदोग्य उपनिषदात एक कथा आहे. एकदा एका माणसाला चोर पकडतात. गांधार या त्याच्या मायदेशापासून दूर नेतात आणि नेताना त्याचे डोळे बांधतात. पुढं त्याला वाळवंटात सोडून देतात. तुला पाहिजे तिकडं जा, असं सांगतात. मग तो ज्याला त्याला वाट विचारू लागतो. लोक सांगतील त्या दिशेनं जाऊ लागतो. याप्रमाणे गावोगाव हिंडता – हिंडता तो पुन्हा गांधार या त्याच्या मायदेशातच परततो. म्हणजे एवढं भ्रमण करूनही परत मूळ गावी येतो… सामान्य माणसाचंही असंच आहे. मायेनं पछाडलेल्या माणसाच्या डोळ्यांवर त्यानं स्वतःच पट्टी बांधून घेतल्यानं, आपलं कायमचं राहतं गाव जवळ असूनही ते दूर आहे, असा त्याचा समज होतो आणि तो वणवण फिरत राहतो. कबीर म्हणतात…
नाँव न जानै गाँव का,
बिन जाने किस जाँव।
चलते चलते जुग भया,
पाव कोस पर गाँव।।
हे जग आंधळं आहे का? की आपण आंधळे आहोत? आपल्या सान्निध्यात असलेल्या वस्तू आपल्याला जिथं आहेत, तिथं आणि जशा आहेत तशा का दिसत नाहीत, समजत नाहीत? ज्या वस्तू शोधायला पाहिजेत, त्यांचं नाव – गावही आपल्याला माहीत नाही. नीटपणे माहिती घेतल्याशिवाय शोध करायला निघाल्यानं विनाकारण आपली पायपीट होते. खरं तर काय शोधायचं असतं आपल्याला? आपल्याला कळतं का ते? की नुसतंच कालप्रवाहात आपणही वाहत जात असतो?
प्रेमाची अखंड स्थिती म्हणजे काय, हे जाणून घ्यावं वाटतं. हृदयाची अमाप शांतता आपल्याला हवी असते. महत्त्वाचं म्हणजे, जगताना कुठल्याही शारीरिक आणि मानसिक बंधनांचा काच आपल्याला नको असतो. प्रेमाची अखंड स्थिती हवी असलेले आपण विषयसुखाच्या वाटेला लागतो. इंद्रियांच्या आपापसातील भांडणांमुळं न संपणाऱ्या मनाच्या कोलाहलात सापडतो आणि जाणीव मंदावून टाकणारी सारी बंधनं बहुतेक आपल्या श्वासासोबतच संपतात. आपल्याला जायचं असतं सुख-दुःखापासून मोकळं करणाऱ्या गावी आणि कुठं पोहोचतो आपण! प्रेम, शांतता आणि मुक्ती यांसारख्या मौल्यवान वस्तू कुठं शोधाव्यात, याचं ज्ञान असतं का आपल्याजवळ? म्हणूनच कबीर सांगतात…
साधु सीप साहिब समुँद,
निपजत मोती माहिं।
बस्तु ठिकाने पाइये,
नाल खाल में नाहिं।।
ईश्वर हा समुद्र आहे, साधू म्हणजे त्यातील शिंपले आहे. सत्यवचनांचे मोती त्या शिंपल्यात तयार होतात. मोतीच शोधायचे असतील, तर समुद्रात बुडी घ्यायला हवी, नाल्यात आणि ओढ्यात ते कसे मिळतील?
कबीर सांगताहेत : जीवनातल्या कुठल्याही मौल्यवान वस्तूचं योग्य आकलन झाल्यावर, खरं मोल कळल्यावर आणि तिचं आपल्या आयुष्यातील स्थान नीटपणे ध्यानात आल्यावरच तिचा आढळ आपल्याला कळू शकतो. या मौल्यवान वस्तूच्या शोधासाठी साधूंची वचनं, त्यांचा बोध आपल्यासाठी आवश्यक असतो. जीवनमुक्त साधूंचे दिशादर्शक वचनमोती आपल्या असण्याचा बोध खोलातून घेणाऱ्या सत्त्वशील साधकाच्या हृदयात असतात. ते उथळपणानं अनुभव घेणाऱ्या शब्दज्ञानी जनांच्या मनाच्या ओढ्यानाल्यात कुठले सापडायला?
हे सारं आपल्या जीवनसाधनेतून जाणून घेणारं कबीरांचं सत्यनिष्ठ हृदय आपल्यासाठी कळवळतं. ते म्हणतात, हे सारं जगण्याचं दर्शन साधूनं घडवलं, तरी माणूस मोहमायेच्या अंधारात चाचपडतच राहतो. आत्मीय वस्तू त्याला दिसत नाही.
कबीर ये जग आघरा,
जैसी अंधी गाय।
बछरा था सो मरि गया,
ऊभी चाम चटाय।।
कबीर आपल्या या दोह्यातून आणखी एका प्रतिकाच्या आधारानं जगाचा भ्रामक आंधळेपणा स्पष्ट करतात. माणसाला जे आहे ते जसंच्या तसं दिसत नाही. त्याच्या दृष्टीवर अज्ञानाची धूळ जमा झालेली असते. म्हणून वास्तविक दर्शनापासून तो वंचित राहतो. मायेचा पसारा दृष्टीत जमा झाल्यानं त्याची दृष्टी एखाद्या आंधळ्या गायीसारखी होते. गाय आपलं पारडू मेलं, तरी त्याचं अंग चाटत राहते.
या प्रतिकातील गायीसारख्या आंधळेपणानं भरलेल्या जगाला कसं समजावता येईल, याची कबीरांच्या करुणामय हृदयाला चिंता वाटते. कबीरांची ही चिंता आपल्याला जगण्याच्या तातडीतून जाणवली, तर आपलं प्रेम, शांतता आणि मुक्ती यांच्या अखंड चित्तस्थितीला बाहेर शोधणं निरर्थक असल्याचा बोध आपल्याला होऊ शकेल. कबीरांना जीवनसाधकाचं हेच डोळसपण आपल्याला सांगायचं आहे!
(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)