
गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी देशाने मिळवलेल्या आर्थिक कामगिरीची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (10 जानेवारी) व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला संबोधित करताना सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. येत्या 25 वर्षात भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी ठेवले आहे. ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता भारत पुढील 25 वर्षांसाठी तयारी करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत विकसित देश बनवण्याचे आमचे ध्येय आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले की, व्हायब्रंट गुजरात समिट हे आर्थिक विकास आणि गुंतवणुकीसाठी जागतिक व्यासपीठ बनले आहे. भारत आणि UAE मध्ये फूड पार्कचा विकास, अक्षय ऊर्जा आणि आरोग्य सेवेतील गुंतवणूक यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ते म्हणाले की UAE कंपन्यांनी भारताच्या बंदर पायाभूत सुविधांसाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली आहे. भारत आणि यूएईने आपले संबंध नव्या उंचीवर नेले आहेत.
पीएम मोदींनी यूएईच्या अध्यक्षांना आपला भाऊ म्हटले
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, येत्या 25 वर्षांत भारताला विकसित देश बनवण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले आहे. भारत-यूएई संबंध अधिक दृढ होण्याचे श्रेय त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना दिले. वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवस्थेत भारत एक जागतिक मित्र म्हणून पुढे जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
विशेष म्हणजे पीएम मोदींनी यूएईच्या अध्यक्षांना भाऊ म्हटले. नहयन भारतात आले हे आपल्यासाठी सन्मानाचे असल्याचे ते म्हणाले. गुजरात समिटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या काही वर्षांत भारत जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होईल असे सर्व प्रमुख रेटिंग एजन्सींचे मत आहे. ते म्हणाले की, जग भारताकडे स्थिरतेचा एक महत्त्वाचा स्तंभ आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढीचे इंजिन म्हणून पाहते.
भारत जगासमोर आत्मविश्वासाचा किरण म्हणून उदयास येतोय – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तर 10 वर्षांपूर्वी भारत 11 व्या स्थानावर होता. आज जगातील प्रत्येक प्रमुख रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की भारत पुढील काही वर्षांत जगातील शीर्ष 3 अर्थव्यवस्था बनेल. ते म्हणाले की, अशा वेळी जेव्हा जग अनेक अनिश्चिततेने वेढलेले आहे. तेव्हा भारत जगासमोर आत्मविश्वासाचा नवा किरण म्हणून उदयास आला आहे.
लोकांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जगातील बदलत्या जागतिक व्यवस्थेबद्दल सांगितले. वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवस्थेत आज भारत विश्वामित्राच्या भूमिकेत पुढे जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताने जगाला विश्वास दिला आहे की, आपण समान उद्दिष्टे ठरवू शकतो आणि आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो. भारताची वचनबद्धता, निष्ठा, प्रयत्न आणि जागतिक कल्याणासाठी केलेले कठोर परिश्रम आजचे जग अधिक सुरक्षित आणि समृद्ध करत आहेत.








