श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे रामराजेंवर टीकास्त्र

0
1
श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे रामराजेंवर टीकास्त्र

फलटण: श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवर प्रशासकाची नेमणूक करत निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरही निशाणा साधला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच तिजोरी लुटली, हे फलटण तालुक्याचे दुर्दैव आहे. रामराजे यांनी सहकारी संस्था अक्षरशः विकण्यास काढल्या आहेत. तालुक्यातील तरुणांनी आता त्यांना घरी बसवण्याचा निर्धार केला आहे.”

“कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर”

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आरोप केला की, “श्रीराम साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज करण्यात आले आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी रिकामी केली. कारखान्यात काहीही शिल्लक नाही. जर शिक्षणावर भर दिला असता, तर बारामतीच्या बरोबरीने प्रगती झाली असती.”

ते पुढे म्हणाले, “20 वर्षांपूर्वी फलटणचा 1 लाख लिटर दूधसंघ होता, तो आज शून्यावर आला आहे. जमीन आणि मशिनरी विक्रीस काढण्यात आली. श्रीराम कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून, मालोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले. मार्केट कमिटीत सहा महिन्यांचे पगार थकले आहेत. एवढेच नाही तर पाणी देखील 30 वर्षे भाड्याने देण्यात आले होते.”

रामराजे विरुद्ध रणजितसिंह – फलटणच्या राजकारणात वाढता संघर्ष

श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा सूर अधिक तीव्र होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष फलटणच्या राजकारणाला नवीन वळण लावणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.