कराड : विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ने मिळवलेल्या यशामुळे सातारा जिल्हा आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे, तर भाजप व ‘महायुती’चा बालेकिल्ला झाला आहे. या यशाचा सन्मान म्हणून भाजप व मित्रपक्षांनी जिल्ह्यासाठी चार मंत्रिपदे दिली असून, आम्ही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी कराड येथे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राजेंद्र यादव, रामकृष्ण वेताळ, एकनाथ बागडी, सागर शिवदास, डॉ. सारिका गावडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
शिवेंद्रराजे म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रेरणा घेत आम्ही विकासाची दिशा आखत आहोत. साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा असली तरी, हा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील.”
सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून कामाचा दर्जा टिकवून रस्त्यांचे जाळे व बांधकामे दर्जेदार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांच्या समन्वयाने सातारा जिल्हा महायुतीच्या विकास योजनांमध्ये अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.