Reserve Bank of India | आरबीआयकडून दहा वर्षांतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा उघड, आकडे वाचून व्हाल थक्क, वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Reserve Bank of India | आरबीआयकडून दहा वर्षांतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा उघड, आकडे वाचून व्हाल थक्क, वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)


Reserve Bank of India : गेल्या दहा वर्षांत देशातील एकूण बँकांमध्ये सर्वात मोठा १ लाख ७१ हजार ७७४ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा २०१९ मध्ये झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या घोटाळ्यातील केवळ ९ टक्के रक्कम बॅंकांमध्ये परत आली. विशेष म्हणजे याच वर्षात देशात लोकसभा निवडणूक झाली. त्यामुळे या घोटाळ्यातील १ लाख ५५ हजार ८१९ कोटी रुपये निवडणुकीत तर वापरले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घोटाळ्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून नोंद

बँकांमधील घोटाळे, अनियमितता, अफरातफर आता नवीन नाही. परंतु, या घोटाळ्याचे आकडे अनेकांच्या भुवया उंचावणारे आहेत. गेल्या दहा वर्षांत, अर्थात २०१३-१४ ते २०२२-२३ या काळात देशातील एकूण बॅंकांंमध्ये ५ लाख ३२ हजार १८१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नोंद केली आहे. आरबीआयने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून घोटाळ्यांच्या आकडेवारीने सरकार, बॅंकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आकडेवारीसोबतच घोटाळ्यांची संख्याही वाढली

घोटाळ्यांतील रकमेच्या आकडेवारीसोबतच घोटाळ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे घोटाळेबाजांवर काहीच कारवाई होत नसल्याने घोटाळ्यांची संख्याही वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विविध बॅंकांमध्ये ६९ हजार ७०७ घोटाळे झाले आहेत. २०१३-१४ या वर्षात ४ हजार २९५ घोटाळे झाले असून घोटाळ्याची रक्कम ९ हजार ९८६ कोटी होती.

दुप्पट रकमेचा घोटाळा झाल्याचे समोर

पुढील २०१४-१५ या वर्षात ४ हजार ६३१ घोटाळे झाले असून, घोटाळ्यातील रक्कम १९ हजार १३ कोटी रुपये एवढी होती. २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये दुप्पट रकमेचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच वर्षात लोकसभा निवडणूक झाली होती. त्यानंतर सातत्याने घोटाळ्यांची संख्या व रक्कम वाढत गेल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. २०१९-२० या वर्षात ८ हजार ५८८ घोटाळे झाले. यात १ लाख ७१ हजार ७७४ कोटींच्या रकमेचा समावेश आहे.

दहा वर्षांतील सर्वात मोठा घोटाळा

रकमेचा विचार केल्यास गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा घोटाळा याच वर्षात झाला. याच वर्षात देशात लोकसभा निवडणूकही झाली. या घोटाळ्यातील काही रक्कम बँकांनी वसुलीही केली. परंतु ही टक्केवारी केवळ ९ आहे. बॅंकांनी घोटाळ्याच्या एकूण रकमेपैकी केवळ १५ हजार ९५५ कोटी वसूल केले. अर्थात १ लाख ५५ हजार ८१९ कोटी रुपये बॅंकांना परत मिळाले नाहीत. ही रक्कम निवडणुकीत तर खर्च केले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.





Source link