रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय प्रभाव वाढतच चालू: सोलापूर पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांच्या वर्णीत मोलाचा वाटा

0
3
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय प्रभाव वाढतच चालू: सोलापूर पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांच्या वर्णीत मोलाचा वाटा

फलटण | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर माजी खासदार निंबाळकर यांना “वाय प्लस एस्कॉर्ट” सह सुरक्षा देण्यात आली आहे. ही सुरक्षा त्यांना पक्षामध्ये महत्त्वाच्या जबाबदारीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सूचक आहे.

जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळवून देण्यात रणजितदादांचा पुढाकार
रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यात आणि त्यानंतर ग्रामविकास खाते मिळवण्यासाठी रणजितदादांनी विशेष प्रयत्न केले. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांची वर्णी लागण्यासाठीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे.

जयकुमार गोरे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताना रणजितसिंह यांना सोबत घेतच पदभार स्वीकारला. या घटनेमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वजन वाढले आहे.

फलटण तालुक्यात राजे गटाची घसरण
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही रणजितदादांनी खचून न जाता लगेचच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सचिन पाटील यांना तिकीट मिळवून दिले आणि त्यांना विधानसभेत यश मिळवून दिले. फलटण तालुक्यात राजे गटाची पकड ढिली होत असून, अनेक निष्ठावंत नेते रणजितदादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत.

नवीन राजकीय समीकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड
रणजितदादांच्या प्रभावामुळे आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजे गटाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्यांच्याच आशीर्वादाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर सहज विजय मिळवता येईल, असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विकासाचे राजकारण आणि मजबूत संघटन शक्ती
रणजितदादांनी लोकसभा सदस्य म्हणून फलटण तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला होता. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. फलटण तालुक्यात विकासाच्या राजकारणाला नवा आयाम मिळाला आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत होत असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा मोठा प्रभाव राहील, हे निश्चित आहे.