आ. रामराजे बुद्धिमान शत्रू, परंतु त्यांनी व खा. शरद पवार यांनी फलटण तालुक्याच्या विकासापासून दूर ठेवल्याने माझा त्यांना विरोध – माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

0
2
आ. रामराजे बुद्धिमान शत्रू, परंतु त्यांनी व खा. शरद पवार यांनी फलटण तालुक्याच्या विकासापासून दूर ठेवल्याने माझा त्यांना विरोध – माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण: आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे बुद्धिमान शत्रू असून, त्यांनी माझ्यावर टीका करून मला जे जे करणे शक्य नाही असे सांगितले, ते सर्व मी आव्हान स्वीकारून पूर्ण केले आहे. त्यांनी आणि खासदार शरद पवार यांनी फलटण तालुक्याचा विकास रोखल्यामुळे माझा त्यांच्यावर वैयक्तिक नाही, परंतु विकासाच्या मुद्द्यावर विरोध आहे, असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण शहरातील गजानन चौक येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सचिन कांबळे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “माझ्या लहानपणापासूनच फलटणच्या विकासाचे व्हिजन मी ठरवले होते. शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या तालुक्याचा विकास होऊ नये म्हणून प्रयत्न केले. त्यांनी फलटणची रेल्वे अडवली, फलटण-बारामती रस्ता होऊ दिला नाही आणि नीरा देवघरचे पाणी आपल्याकडे वळवले. त्यामुळे माझा त्यांना विरोध आहे.”

ते पुढे म्हणाले, “रामराजे यांनी माझ्यावर टीका केली की मी उपळवेचा साखर कारखाना उभारू शकणार नाही, पण तो मी उभारला. त्यांनी म्हटले की, मी खासदार होऊ शकत नाही, पण मी खासदार झालो. मी त्यांच्या प्रत्येक टीकेला कामातून उत्तर दिले आहे.”

“मला बारामतीच्या विकासाशी स्पर्धा करायची आहे. फलटणचे नाव उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. माझा पराभव झाला तरी मी खचलेलो नाही. सचिन कांबळे पाटील यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांची यादी दिली, ज्यात फलटण-बारामती रेल्वे, फलटण-पंढरपूर रेल्वे, नीरा देवघर कालव्याची कामे, नवीन आरटीओ ऑफिस, नवीन जिल्हा न्यायालय, आणि रस्त्यांचे चौपदरीकरण यांचा समावेश आहे.

सभेत माजी नगरसेवक अनुप शहा यांनीही राजे गटावर तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, “राजे बंधूंनी तालुक्यात गुन्हेगारीला आश्रय दिला आहे. त्यांनी आपल्या घरातच सर्व पदे राखून ठेवली आहेत. आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल.”