फलटणः फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अपहरण केल्यानंतर, निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करत 4 लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका महिलेसह सहा आरोपींना 12 तासांच्या आत फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारदार सजल विलास दोशी (वय 37 वर्षे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चार महिन्यांपासून त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिला अधूनमधून पार्सल घेण्यासाठी येत होती. 30 ऑगस्ट 2024 रोजी, ती महिला फिरायला जाण्यास सजल यांच्यासोबत तयार झाली. मोटरसायकलवरुन सुरवडी, लोणंद आणि वीरधरण या ठिकाणी फिरून परत येताना काळज-बडेखान जवळ दोन इसमांनी त्यांना अडवले आणि “आमच्या बहिणीला कुठे फिरवता?” म्हणून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी सजल यांना निर्जन ठिकाणी नेऊन 26,000 रुपये फोन पे द्वारे उकळले आणि आणखी 4 लाख रुपये देण्याची धमकी दिली.
पोलीस तपासात, सदर महिलेच्या मदतीने आरोपींनी हनीट्रॅपमध्ये अडकवून ही फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ गोपनीय तपास करून, महिला आणि अन्य पाच पुरुष आरोपींना अटक केली आहे. यापूर्वीही या टोळीने फलटण-लोणंद परिसरात अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा संशय आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
हॅशटॅग्स: