धरण आमच्या मेहनतीने, आणि श्रेय घेणारे दुसरेच! – आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

0
2
धरण आमच्या मेहनतीने, आणि श्रेय घेणारे दुसरेच! – आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण: “नीरा-देवघर धरणासाठी आम्ही मेहनत घेतली, पाणी अडवले, आणि आता कालव्याचे काम सुरू झाल्यावर काही जण श्रेय घेऊ पाहत आहेत. साधं गणित आहे—धरणच नसतं तर कालवा कसा झाला असता?” असा रोखठोक सवाल उपस्थित करत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

श्रीराम कारखान्याच्या अस्तित्वाला धोका
जाधव वस्ती, राजाळे (ता. फलटण) येथे जाधव कुटुंबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार दीपक चव्हाण, माजी सरपंच संभाजी निंबाळकर, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन सुखदेव बेलदार पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव बुरुंगले आदी मान्यवर उपस्थित होते.

“आपलं पाणी कमी करून हे सांगोल्याला पाणी देऊ पाहत आहेत. जर हे घडलं, तर ३६ गावांचं पाणी कमी होईल आणि उसाच्या उत्पादनावर परिणाम होऊन साखर कारखान्यांवर संकट येईल,” असा इशारा रामराजे यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना बंद करण्याचा डाव?
“श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद करून, शेतकऱ्यांच्या उसावर डोळा ठेवणाऱ्यांचा हा साधा हिशोब आहे. विरोधकांच्या खाजगी कारखान्यांना फायदा व्हावा म्हणून श्रीराम कारखाना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण शेतकऱ्यांनी सावध राहावं, आम्ही हा डाव यशस्वी होऊ देणार नाही,” असे रामराजे ठामपणे म्हणाले.

“उपळव्याच्या कारखान्यावरही लक्ष ठेवणार!”
“जे श्रीराम कारखान्याविरोधात बोलतात, त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या अनेक कारवाया माझ्या लक्षात आहेत. श्रीरामच्या निवडणुकीत त्यांनी समोर यावं, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.

याच दरम्यान, ऊस बिलाबाबत भाष्य करताना ते म्हणाले, “उपळव्याच्या कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले का? स्वतःचा खाजगी कारखाना वेळेवर चालवता येत नाही आणि श्रीराममध्ये लक्ष घालायचं? जर तुम्ही श्रीराममध्ये लक्ष घालाल, तर मग मी उपळव्याच्या कारखान्यात लक्ष घालेन!”

“वादळ जवळ आलंय, सावध राहा!”
“आतापर्यंत फुटीरता दाखवली जात होती, पण आता आम्हाकडे कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू आहे. हे वादळापूर्वीचं शांत वातावरण होतं, आता वादळ जवळ आलंय!” असा स्पष्ट इशारा त्यांनी विरोधकांना दिला.