फलटण : “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला आमदार करायची योजना आखली होती, हे मला कधीही समजले नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. फलटणच्या विकासाच्या मुद्यावर बारामतीसारखा निधी मिळाला असता, तर फलटणचाही विकास झाला असता, असा दावा त्यांनी केला.
साखरवाडी येथे ९ नोव्हेंबर रोजी अजित पवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना संजीवराजे म्हणाले, “अजित पवार हे कार्यक्षम नेते आहेत, पण बारामतीप्रमाणे विकास हवा असेल तर फलटणला देखील समान निधी द्यावा लागेल.” त्यांनी आरोप केला की बारामतीला मिळणारा निधी तुलनेत फलटणला कमी मिळतो, ज्यामुळे विकासात फरक पडतो.
कमिन्स कंपनीच्या मुद्द्यावर, संजीवराजे यांनी स्पष्ट केले की, “कमिन्ससारख्या बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवहार पारदर्शक असतात. रोखीने व्यवहार होत नाहीत, त्यामुळे श्रमिकांच्या पगारासंबंधीचे आरोप निराधार आहेत.” तसेच श्रीराम कारखान्याच्या व्यवस्थापनाबाबत ते म्हणाले, “शेतकऱ्यांना जास्त फायदा होण्यासाठी कारखान्याचे भाड ठेवले आहे.”
फलटणच्या पाणी समस्येवर भाष्य करताना, त्यांनी सांगितले की फलटण व खंडाळा हे तालुके पाणी मिळण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत.