
आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यामध्ये अजित पवार गटाला एकही मंत्रिपद देण्यात आलेल नाही.
दिल्ली : आज देशभरासह संपूर्ण जगाचे लक्ष नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांच्या गळामध्ये मंत्रीपदाची माळ पडते याची उत्सुकता सर्वांना लागली असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहेत. अजित पवार यांच्या गटाला नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये एकही जागा मिळालेली नाही.
अजित पवार गटासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि भविष्य ठरवणारी होती. यामध्ये अजित पवार गटाला राज्यामध्ये चार जागांपैकी केवळ एका जागेवर यश मिळाले. बारामतीचा गड देखील अजित पवार यांना जिंकता आलेला नाही. याचा परिणाम म्हणून अजित पवार गटाला केंद्रामध्ये एकही जागा न मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रामध्ये दोन मंत्रीपदं मिळावी अशी आधी अजित पवार गटाने मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांची केवळ एक जागा अजित पवार गटाला मिळाली. तसेच राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल असे एक राज्यसभा खासदार अजित पवारांकडे आहे. एका जागेची तरी अपेक्षा असताना अजित पवार गटाला एक देखील मंत्रिपद देण्यात आलेले नाही. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.