सातारा: जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
समितीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार, सरकारने जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे अनेक शाळांमध्ये केवळ एक शिक्षक शिल्लक राहतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची शक्यता आहे.
मोर्चाचा मार्ग: हा मोर्चा राजवाडा, राजपथ, पोलीस करमणूक केंद्र मार्गे, कर्मवीर भाऊराव पाटील पथाने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग असेल. मोर्चाची सुरुवात दुपारी १२ वाजता गांधी मैदानावर होईल आणि १ वाजता मोर्चाला प्रारंभ होईल. मोर्चादरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
तालुक्यांच्या क्रमानुसार शिक्षक मोर्चात सहभागी होतील. नवीन शिक्षण सेवकांना रजेवर जाण्याची सक्ती केली जाणार नाही. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम टाळण्यासाठी तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
सरकारच्या या धोरणामुळे गोरगरीबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात येऊ शकते, असे समितीने म्हटले आहे. कमी पट असणाऱ्या शाळांमध्ये पाच वर्गासाठी एक-दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य रीतीने होऊ शकत नाही, असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.