
केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आल्याने १३ कोटी जनतेची मागणी तब्बल ६ दशकांनंतर मान्य झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मराठीसह भारतातील पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. देशात अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या भाषांची संख्या ११ झाली आहे.




