मुंबईसाठी पुन्हा ‘मराठा मोर्चा’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

0
33
मुंबईसाठी पुन्हा ‘मराठा मोर्चा’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

फलटण : मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा उभारण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्धार मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यात फलटण येथे मराठा समाजाच्या बैठकीत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली. “ओबीसींच्या हक्कासाठी लढणार म्हणजे मराठ्यांसाठी लढणार नाही, असा अर्थ होतो. मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, राज्यात दंगल घडली तर त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार असतील,” असा इशारा त्यांनी दिला.

जरांगे पाटील म्हणाले, “29 तारखेला आम्ही आरक्षणाचा तुकडा पाडणार आणि तेही ओबीसीतूनच घेणार. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून मोठी ताकद मुंबईत येणार आहे, तर मराठवाडा-विदर्भही मागे राहणार नाही.”

त्यांनी भाजपवरही थेट हल्ला चढवला. “देवेंद्र फडणवीस हे भाजप संपवायला निघाले आहेत. मराठा मंत्र्यांना घोटाळ्यात क्लीनचीट मिळत नाही, सर्व पक्षातील मराठा नेते संपवण्याचा डाव सुरू आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी ‘पॉवर ॲक्शन कमिटी’ तयार करावी,” असे आवाहन त्यांनी केले.

ओबीसी आणि मराठा समाजात ऐक्य राखत, “फडणवीसांना अद्दल घडवू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. “गोव्याला ओबीसी नेत्यांना बोलावून मराठ्यांविरोधात कान भरले जात आहेत. मात्र, आमच्यात दंगल होणार नाही. पण जर झाली, तर जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच असेल आणि त्याचा फटका केंद्र सरकारलाही बसेल,” असा इशारा त्यांनी दिला.