महार रेजिमेंटचा स्थापना दिवस: पराक्रम, स्वामीनिष्ठेची गौरवगाथा

0
1
महार रेजिमेंटचा स्थापना दिवस: पराक्रम, स्वामीनिष्ठेची गौरवगाथा

फलटण : १ ऑक्टोबर १९४१ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे बेळगाव येथे महार रेजिमेंटची स्थापना झाली. महार सैनिकांचा पराक्रम आणि स्वामी निष्ठा ब्रिटिश सरकारने मान्य केली होती. याआधी १९३९ मध्ये डॉ. आंबेडकरांनी महार बटालियनच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. आज, महार रेजिमेंटने २३ बटालियन तयार केल्या असून, या रेजिमेंटने १९४७ सालच्या काश्मीर युद्ध, १९६२ चे चीन-भारत युद्ध, १९६५ आणि १९७१ चे भारत-पाक युद्ध यांसारख्या अनेक युद्धांमध्ये वीरतेचे दर्शन घडवले आहे.

महार रेजिमेंटचे योगदान केवळ युद्धभूमीपुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या पराक्रमाला मान्यतेच्या स्वरूपात एक परमवीर चक्र, चार महारवीर चक्र, २९ वीर चक्र, २ कीर्ती चक्र, एक अशोक चक्र आणि ५ परमविशिष्ट सेवा पदक यांसारखे पुरस्कार मिळाले आहेत.

महार सैनिकांचा लढाऊ इतिहास फार जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महार हे एक महत्त्वाचे स्थान धरून होते. महार सैनिकांनी किल्ल्यांच्या रक्षणात आणि स्वराज्याच्या सुरक्षेत मोठा वाटा उचलला. १८१८ मध्ये झालेल्या कोरेगावच्या युद्धात महार सैनिकांनी पेशवांचा पराभव केला आणि या लढाईत धारातीर्थी पडलेल्या २२ महार सैनिकांची नावे आजही विजयस्तंभावर कोरलेली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ मध्ये महार बटालियनच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न केले, आणि अखेर १ ऑक्टोबर १९४१ रोजी बेळगाव येथे पहिली महार रेजिमेंट स्थापन झाली. यासोबतच डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या वडिलांचा आदर्श घेऊन महार सैनिकांना सैनिकी पेशामध्ये प्रवेश मिळवून दिला.