
दोन दिवसांपूर्वी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी उपचाराअभावी मृत्यू झाल्याचं सांगत रुग्णांच्या नातेवाईकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. या घटनेवर स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संताप व्यक्त केला होता. परंतु आता या घटनेच्या दोनच दिवसांनंतर आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत पावलेल्या १३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर चार रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे वृद्ध होते, त्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.






