जनसन्मान यात्रा २ सप्टेंबर रोजी बारामतीत दाखल

0
1
जनसन्मान यात्रा २ सप्टेंबर रोजी बारामतीत दाखल

बारामती : राज्य शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना,शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, मोफत सिलेंडर अशा अनेक योजना जाहीर केल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभर ‘जनसन्मान यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्तानं अजितदादा लाडक्या बहीणींसह समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत.सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी जनसन्मान यात्रा बारामतीत दाखल होणार आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसह
अन्य योजना जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी ‘जनसन्मान यात्रा’ काढत राज्यभर दौरा
सुरू केला आहे. उद्या सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी
जनसन्मान यात्रा बारामतीत दाखल होत असून
अजितदादा आपल्या लाडक्या बहीणींशी संवाद
साधणार आहेत. तत्पूर्वी बारामती शहरात रोड शो
होणार असून या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी
करण्यात आली आहे.

बारामती शहरातील मिशन हायस्कूलच्या मैदानात जनसन्मान यात्रेनिमित्त ‘संवाद’ कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये अजितदादांसह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील अनेक नेते, मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत. बारामती विमानतळापासून अजितदादा रॅलीद्वारे बारामती शहरात प्रवेश करतील. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाईल. त्यानंतर कसबा येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रोड शोची सुरुवात केली जाणार आहे.

शहरातील गुणवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक, भिगवण चौक येथून ही रॅली तीन हत्ती चौकमार्गे मिशन हायस्कूलच्या मैदानावर दाखल होतील. सकाळी ११ वाजता जनसन्मान यात्रेच्या मुख्य सभेला सुरुवात होणार असून अजितदादांसह विविध मान्यवर उपस्थित महिला भगिनी आणि बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. या जनसन्मान यात्रेची बारामतीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी अजितदादांनी जाहीर केलेल्या योजनांचे फलक, स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत.

बारामतीत होत असलेल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सुरू असलेल्या तयारीचा युवा नेते पार्थ पवार हे सातत्याने आढावा घेत आहेत. पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांवरील पदाधिकारी यांच्या बैठका घेत पार्थ पवार यांनी या यात्रेचं नियोजन केलं आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पार्थ पवार यांनी विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळत आहे.