
देशपातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यात महविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केल्यास राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होऊ, असे पत्र वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठवले आहे.
मुंबई : देशपातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यात महविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश केल्यास राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होऊ, असे पत्र वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठवले आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. या भारत जोडो न्याय यात्रेत सामील व्हावे, असे आमंत्रण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिले आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारले असून, आंबेडकरांनी काँग्रेससमोर एक अट ठेवली आहे.
देशातील विरोधकांच्या इंडिया आघडीत आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी करून घेतले, तरच भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. देशभरातील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत ‘वंचित’ सहभागी होणार का? असा प्रश्न आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा संपर्क सुरू आहे. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावर अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे वंचित मविआमध्ये सामील होणार की नाही, याची स्पष्टता नाही.










