फलटण | प्रतिनिधी:- श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने काल (२८ जून) फलटणमध्ये मुक्काम केला होता. हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या अध्यात्मिक सोहळ्यानंतर आज सकाळी (२९ जून) पालखीने पुढील प्रवासासाठी बरडकडे प्रस्थान केले.
पालखीच्या प्रस्थानानंतर काही तासांतच पालखी तळाची स्वच्छता मोहिम फलटण नगरपरिषद आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली. मुक्कामी झाल्यानंतर पालखी तळाभोवती मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला असतो. मात्र, तात्काळ राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
याचबरोबर पालखी मुक्कामी असलेल्या विमानतळावर दररोज व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठीही लवकरच नियमित वापराची सुविधा पुन्हा उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.
विशेष बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर व त्यांच्या २५ कर्मचाऱ्यांची टीम स्वखुशीने फलटण पालखी तळावर सेवा देण्यासाठी दाखल झाली असून त्यांनीदेखील स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.
वारकरी भक्तीने येतात आणि प्रशासन जबाबदारीने स्वच्छता राखतं – हीच खरी पुण्याई!