धुवांधार पावसाने महाराष्ट्राची झोडपलं! माण-फलटण तालुक्यांत वाहतूक ठप्प, धुमाळवाडीत रेकॉर्डब्रेक पाऊस

0
1
धुवांधार पावसाने महाराष्ट्राची झोडपलं! माण-फलटण तालुक्यांत वाहतूक ठप्प, धुमाळवाडीत रेकॉर्डब्रेक पाऊस

सातारा :- महाराष्ट्रात मान्सूनने वेळेआधी हजेरी लावताच राज्यभर मुसळधार पावसाचा कहर सुरु झाला आहे. अनेक भागात नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, रस्ते जलमय झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील माण व फलटण तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे.

धुवांधार पावसामुळे दहिवडी-फलटण, शिंगणापूर-फलटण, आंधळी-मलवडी, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी आदी रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेले असून, वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. शिंगणापूर परिसरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढे-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावात पाण्याची मोठी आवक झाली आहे.

दरम्यान, फलटण तालुक्यातील धुमाळवाडीसह अनेक गावांमध्ये तब्बल 251 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 30 वर्षांत प्रथमच धुमाळवाडी पाझर तलाव भरून वाहू लागला आहे, ज्यामुळे परिसरातील 50 हून अधिक गावांच्या शेतीला पाणीपुरवठा होणार आहे.

दक्षिण कोकण व गोवा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 36 तासांत राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत शेतीपिकांचे नुकसानही झाल्याचे समोर येत आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन तब्बल 12 दिवस आधी झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. उकाड्याने त्रस्त जनतेला या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असला, तरी काही भागांत आपत्तीजनक परिस्थितीही निर्माण झाली आहे.