फलटण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत खा. शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी फलटणच्या चळवळींचे योगदान अनमोल आहे. याच चळवळीतून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि कॉ. हरिभाऊ निंबाळकर आमदार झाले, ही परंपरा फलटणची आहे. आता आपण महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी तयारी करायला हवी.” त्यांनी लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांच्या मानसिकतेवर भाष्य केले.
सभा प्रास्ताविक करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभे राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत आहोत. भाजपने तालुक्यातील राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता पवार साहेबांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.”
खा. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर टीका करत, “मंत्री आणि आमदार विकत घेता येतात हे दिल्लीवाल्यांनी दाखवून दिलं. पण महाराष्ट्रात टायगर अजून जिवंत आहे,” असे विधान करून उपस्थितांमध्ये उत्साह वाढवला. त्यांनी महागाई, कर वाढ आणि भाजपाच्या धोरणांवरही गंभीर आरोप केले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर टीका करत म्हटले, “रामाचं मंदिर बांधलं, पण भाजपचे उमेदवार हरले. जसं देव दिसत नाही, तसाच रामराजे या व्यासपीठावर दिसत नाहीत.” त्यांनी फलटणमधील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या यशाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.
आ. दिपक चव्हाण यांनी भाजप नेतृत्वाच्या दहशतवाद आणि गुंडगिरीला साथ दिल्याचा आरोप केला. “महायुतीत सन्मान कुठेच मिळाला नाही, म्हणून हा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे संजीवराजे यांची अदृश्य शक्ती होती, आता ती उघड आहे.” ते म्हणाले, “जनता आता हुशार आहे आणि त्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्व उमेदवारांना विधानसभेत पाठवायचं ठरवलं आहे.”
या सभेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात मोठा बदल घडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.