नगर परिषदा व नगर पंचायतीतील अनुकंपा नियुक्ती घोटाळा: सखोल चौकशीची मागणी

0
2
नगर परिषदा व नगर पंचायतीतील अनुकंपा नियुक्ती घोटाळा: सखोल चौकशीची मागणी

फलटण – सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये मयत कर्मचारी वारसांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जयवंत राजकुमार राऊत यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जयवंत राऊत यांच्या निवेदनानुसार, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नियुक्तीसाठी अनुकंपा प्रस्ताव मागवले जात असताना संबंधित कार्यालयातील अधिकारी गणेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमत करून लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाच घेतल्याचा आरोप आहे. त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येकी ₹50,000 ते ₹1,00,000 पर्यंतची रक्कम घेतल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

70 ते 80 लाखांचा गैरव्यवहार:
या लाचखोरीतून 70 ते 80 लाख रुपयांची रक्कम गोळा झाल्याचा आरोप असून, नियुक्ती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच, राऊत यांनी मागणी केली आहे की, चौकशी पूर्ण होईपर्यंत अनुकंपा धारकांच्या प्रतीक्षा यादीवर कोणताही निर्णय घेऊ नये आणि संबंधित अधिकारी गणेश चव्हाण यांच्याकडून सर्व फायली ताब्यात घ्याव्यात.

चौकशीची मागणी:
गणेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना, अडकलेल्या पैशांची परतफेड होण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक अधिकाऱ्यांचे गैरव्यवहार उघड होतील, अशी चर्चा होत आहे.

लोकांच्या अपेक्षा:
सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यावर काय कारवाई करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जिल्ह्यात खळबळ माजली असून, तातडीने कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.