
Karnataka CET Exam Controversy: सीईटी परीक्षेवेळी सर्व राज्यांमध्ये अनेक कठोर नियमांचे पालन केले जाते. यामुळे काही राज्यांमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान वादाला तोंड फुटल्याच्या घटना समोर येत असतात. कर्नाटकातील शिवमोगा येथे सीईटी म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट दरम्यान वाद निर्माण झाला. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना जानवं आणि मनगटावरील धार्मिक धागा काढण्यास सांगण्यात आले. हेच वादाचे मूळ बनले.
शिवमोग्गा येथील आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. सीईटी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रावर येते होते. सर्व परीक्षार्थींची कसून तपासणी सुरु होती. दरम्यान 3 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर थांबवण्यात आले. त्यांच्या अंगावरील जानवं आणि हातावर बांधलेला संरक्षक धागा (कलावा) काढण्यास सांगण्यात आलं.
सीईटी परीक्षेत काय झाले?
गेटवर उपस्थित असलेले सुरक्षा रक्षकांनी परीक्षार्थींची कसून तपासणी करत होते. यावेळी त्यांनी 2 विद्यार्थ्यांना हटकले. कारण त्यांनी जानवं आणि मनगटात धार्मिक धागा बांधला होता. धार्मिक धागा परीक्षेच्या आड येत नव्हता, त्यामुळे आम्हाला परीक्षेला जाऊ द्या, असे विद्यार्थी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षक ते ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. जानवं आणि कलावा काढा तरच प्रवेश मिळेल यावर सुरक्षारक्षक ठाम होते. यातील तिसरा विद्यार्थी धागा न काढण्यावर ठाम होता. त्यामुळे विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांतील वाद वाढत गेला आणि हळुहळू तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले.
ही घटना 16 एप्रिल रोजी घडली. ज्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला सुमारे 15 मिनिटे गेटवर थांबवण्यात आले. अखेर रक्षकांनी त्याच्या हातातील संरक्षक धागा काढला आणि यानंतरच परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. ही माहिती हळूहळू संपूर्ण परिसरात पसरली आणि प्रकरणाला वेगळेच वळण लागले. अखिल कर्नाटक ब्राह्मण सभेने या घटनेचा निषेध केल. त्यांनी तात्काळ जिल्हा दंडाधिकाऱ्यांची (डीएम) भेट घेतली आणि कठोर कारवाईची मागणी केली. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोषींवर त्वरित कारवाई करावी, असा आरोप त्यांनी केला.
पीडितेच्या पालकांनी काय म्हटले?
पीडित विद्यार्थ्याच्या काकांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली. ‘माझा पुतण्या आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेजमध्ये सीईटीसाठी गेला होता. तिथे गार्डने त्याला टी-शर्टच्या आत घातलेलं जानवं आणि मनगटावर बांधलेला संरक्षक धागा काढण्यास सांगितल्याचे’, ते म्हणाले. धाग्यासह परीक्षा केंद्रात प्रवेश देणार नसाल तर मी परीक्षा देणार नाही, अशी भूमिका पुतण्याने घेतली. यानंतर त्याला 15 मिनिटे बाहेर बसवण्यात आले. नंतर त्याला धाग्यासह परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आल्याची मााहिती त्याच्या काकांनी दिली. यानंतर जानवं घालून त्याला परीक्षेसाठी सोडण्यात आलं. पण त्याच्या हातावरील धागा काढून कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. माझ्या पुतण्याआधी दोन मुलांसोबतही अशाच प्रकारे धागा काढून फेकण्याचा प्रकार घडला होता.
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री काय म्हणाले?
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री एम.सी. सुधाकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘असे घडायला नको होते. जर हे घडले असेल आणि दावा केल्याप्रमाणे असेल तर ते निषेधार्ह आहे. मी कार्यकारी संचालकांकडून अहवाल मागितला असल्याचे’, ते म्हणाले. परीक्षांसाठी काही निश्चित प्रोटोकॉल आहेत. जे प्रत्येक संस्था पाळते. पण त्यात जानवं किंवा मनगटातील धागा काढून टाकण्याचा कोणताही उल्लेख नाही. जर तपासात हे खरे ठरले तर विभाग दोषी लोकांवर कारवाई करेल, असेह ते म्हणाले.