बुद्धलेणी बचाव मोर्चा: लाखोंचे जोरदार आंदोलन, बौद्ध स्थळाच्या रक्षणासाठी जनसागर रस्त्यावर

0
1
बुद्धलेणी बचाव मोर्चा: लाखोंचे जोरदार आंदोलन, बौद्ध स्थळाच्या रक्षणासाठी जनसागर रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर  – गेल्या ७० वर्षांपासून बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खू कुटीला बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घटनेमुळे बौद्ध समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या धार्मिक स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी, तसेच या कृत्याचा निषेध करण्यासाठी भिक्खू संघाच्या नेतृत्वात आज सोमवारी क्रांती चौकातून “बुद्ध लेणी बचाव” महा मोर्चा काढण्यात आला.

लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांचा सहभाग

या महामोर्चामध्ये राज्यभरातून लाखो बौद्ध उपासक, उपासिका, आणि विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. बोधी महायेरी आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाच्या सुरुवातीला बुद्धमूर्ती व भिक्खू संघाच्या पुढाकाराने मोर्चा सुरू झाला.

विविध मागण्या आणि प्रमुख मागणी

मोर्चामधून अनेक मागण्या करण्यात आल्या. मुख्य मागण्या म्हणजे विपश्यना केंद्राला “बौद्ध सर्किट” अंतर्गत समाविष्ट करावे, हर्सल टी पॉइंट चौकात गौतम बुद्धांचा पुतळा बसवावा, बुद्धलेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, आणि चिकलठाण विमानतळाला ‘अजिंठा’ हे नाव देण्यात यावे.

विविध संघटनांचा सहभाग

या महामोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भिमशक्ती संघटना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट), आंबेडकरवादी संघर्ष समितीसह अनेक आंबेडकरी पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आणि मोर्चात सक्रिय सहभाग घेतला.

घोषणाबाजी आणि आवेशपूर्ण वातावरण

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!” आणि “बुद्धलेणी के सम्मान में, हम सब मैदान में!” या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते, आणि हातात पंचशील ध्वज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, आणि संविधानाच्या प्रती घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.