
आईच्या स्मृती जपण्यासाठी भालेराव परिवाराचे विज्ञानवादी व पर्यावरणपूरक वृक्षारोपण
फलटण : भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयुष्यमान महावीर सर्जेराव भालेराव व त्यांच्या परिवाराने मातोश्री पुष्पावती सर्जेराव भालेराव यांच्या निधनानंतर पर्यावरणपूरक व विज्ञानवादी पद्धतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. विशेष म्हणजे लोक माणसांमध्ये अस्थि संकलन, विसर्जन विधी हा शनिवारी न करता इतर दिवशी करण्याची प्रथा प्रचलित असताना सुद्धा व त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसताना सुरू असणाऱ्या अनिष्ट अवैज्ञानिक प्रथेला फाटा देऊन अस्थि संकलन, विसर्जन व पुण्यानुमोदनाचा विधी भालेराव परिवाराने शनिवार घेऊन समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे अस्थी पाण्यात विसर्जन न करता, बौद्ध धम्माच्या पर्यावरणवादी दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या मातोश्रींच्या अस्थींचे संकलन करून स्मशानभूमी, राहते घर व शेतामध्ये बोधिवृक्ष, आंबा व बकुळी या वृक्षांचे रोपण केले.
या उपक्रमातून जलप्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला गेला. बुद्धांच्या शिकवणीत “प्रकृतीशी मैत्री” व “विज्ञानवादी आचरण” यांचा संदेश आहे. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत भालेराव कुटुंबाने अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करून आईच्या स्मृतींना चिरंतन व जीवनदायी रूप दिले.
यावेळी बौद्ध धम्माचे धम्मगुरु भंते काश्यप जी यांनी बौद्ध धर्माच्या संस्कार विधीप्रमाणे गाथा पठण करून आशीर्वाद दिले.
या प्रसंगी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय, राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच परिवारातील बंधू सतीश सर्जेराव भालेराव, भगिनी पंचशीला साबळे (आक्का), केंद्रीय व राज्य संघटक तथा पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले,भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्ह्याच्या संस्कार सचिव व राज्याच्या संघटक आयुनि अविंदा वाघमारे मॅडम, समता सैनिक दलाच्या आयुनि अर्चना चव्हाण, लोणद शाखेच्या आयुनि सोनल खरात, खटाव तालुक्याचे आयु सुनील कदम केंद्रिय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका शाखेचे सचिव आयु महेंद्र गायकवाड(मामा),भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे महासचिव आयु.बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, तालुका शाखेचे कार्यालय सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते,संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आयु. संपत भोसले, संस्कार विभागाचे सचिव आयु.बजरंग गायकवाड, अमोल भोसले, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष केशव ठोंबरे सर, हिशोब तपासनीस आयु.सतिश कांबळे सर, संघटक विजयकुमार जगताप,आनंद जगताप, स्वप्नील गायकवाड, ऍड.चंद्रशेअर मोरे, धम्मसेवक बौद्धाचार्य संजय प्रल्हाद घोरपडे सर, जेष्ठ समाज सेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडी च्या महिला पदाधिकारी चित्राताई गायकवाड, लोक कलावंत तथा समता सैनिक दलाचे माजी पदाधिकारी लक्ष्मण निकाळजे, जिल्ह्याचे माजी हिशोब तपासणीस अविनाश जगताप, माजी फलटण तालुका अध्यक्ष शंकर कांबळे, व नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ आईच्या स्मृती जपण्यापुरता मर्यादित नसून समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. “अस्थींचे विसर्जन नद्यात,कॅनॉल किंवा समुद्रात न करता वृक्षारोपणाद्वारे पर्यावरणाला जीवनदान द्या,” हा बौद्ध धम्माचा आधुनिक व विज्ञानाधिष्ठित संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
भालेराव परिवाराचे हे पाऊल पर्यावरणप्रेम, विज्ञाननिष्ठा व बौद्ध धर्मातील करुणा या तिन्ही मूल्यांचा संगम ठरत आहे.







