ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी अहवाल अद्यापही प्रलंबित, आंदोलनाचा इशारा

0
28
ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी अहवाल अद्यापही प्रलंबित, आंदोलनाचा इशारा

अकलूज ( साहस Times प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील मौजे तांबवे ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व लिपिकाने संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला असून याविरोधात दिव्यांग क्रांती लोकसेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन २२ मे २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात आले होते.

संघटनेने केलेल्या आरोपांनुसार, ग्रामसेवक एस.एस. जाधव भाऊसाहेब आणि लिपिक एस.एम. ढोबळे यांनी १४ वा व १५ वा वित्त आयोग, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, दलित वस्ती सुधार योजना, जलजीवन मिशन, शाळा खोली व अंगणवाडी बांधकाम आदी विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासन व जनतेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांनी शासन निधीचा अपहार करून स्वतःच्या नावावर अवैध स्थावर-जंगम मालमत्ता कमावल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे.

या भ्रष्टाचारविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेत माळशिरस पंचायत समितीने १५ दिवसांत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज पंधरा दिवस उलटूनही गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केलेली नाही, त्यामुळे संघटना नाराजी व्यक्त करत आहे.

संस्थापक अध्यक्ष सत्यवान भोसले यांनी सांगितले की, “प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जर लवकरात लवकर सखोल चौकशी न होऊन कारवाई झाली नाही, तर संघटनेच्यावतीने अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येईल.”

संघटनेने पाठवलेल्या निवेदनात पुढील मागण्या ठेवण्यात आल्या आहेत :

  • संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय जातेनिहाय सखोल चौकशी करण्यात यावी.
  • ईडी, भ्रष्टाचारविरोधी दक्षता पथकाद्वारे मनी लॉन्ड्रिंग व अपहार प्रकरणी तपास करण्यात यावा.
  • चौकशी पूर्ण होईपर्यंत ग्रामसेवक जाधव यांची अन्य ग्रामपंचायतीत बदली करू नये.
  • लिपिक ढोबळे यांना कोणतीही पदोन्नती, इन्क्रिमेंट अथवा वेतनवाढ देऊ नये.

न्यायाची अपेक्षा ठेऊन आंदोलन थांबवण्यात आले होते, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संघटना पुन्हा आक्रमक पावले उचलणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

साहस Times