रसिक स्पेशल: सोशल मीडियावरचा वाह्यातपणा आणि आपण

0
16
रसिक स्पेशल:  सोशल मीडियावरचा वाह्यातपणा आणि आपण


अतुल कहाते14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अलाहाबादियाच्या प्रकरणात पूर्ण दोष त्याचा, त्या ‘शो’च्या संयोजकांचा आणि तो सादर करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आहेच. पण, आपणही कधी अंतर्मुख होणार की नाही? की वाह्यातपणा करणाऱ्यांनी करत राहावा, न्यायालयाने कान उपटावे, सरकारने कायदे करावे अन् आपण मात्र अशा गढूळ पाण्यात डुंबत राहावं?

अलीकडं ‘सोशल मीडिया’ म्हणजेच समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेला लिखित किंवा दृकश्राव्य प्रकारचा आशय आणि त्यासंबंधीच्या निकषांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आहे. त्याच जोडीला, डिजिटल विश्वातील ‘इन्फ्ल्युएन्सर’ नावाची नवी जमात प्रचंड प्रभावी ठरत असल्याचंही ठळकपणे समोर येत आहे.

या दोन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून एका शोमध्ये रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या अश्लाघ्य संभाषणामुळे देशभर संतापाची लाट उसळली. ‌अगदी सर्वोच्च न्यायालयालानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यावर खरमरीत टिप्पणी केली. त्यामुळं सोशल मीडियाचं आणि त्यावर होत असलेल्या गैरप्रकारांचं काय करायचं, हा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.

पहिला मुद्दा सोशल मीडियाचा. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही यांसारख्या मुख्य माध्यमांच्या तुलनेत अलीकडे सोशल मीडिया विलक्षण लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे. प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाइल, स्वस्तातील इंटरनेट आणि नोबेल पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञांच्या मुलाखतींपासून ते अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदूंच्या कारनाम्यांपर्यंतचे सगळे प्रकार इथे उपलब्ध असतात. खरी करमणूक आणि ज्याला करमणूक का म्हणावं, असा प्रश्न पडावा अशा प्रकारच्या पाचकळपणात तर अख्खा देश बुडून गेला असल्याचं विदारक चित्र सतत डोळ्यासमोर येतं.

साहजिकच या सोशल मीडियावर आपला जम बसवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी असंख्य लोकांची धडपड सुरू असते. त्यातूनच जन्मलेले ‘इन्फ्ल्युएन्सर’ आपल्या प्रेक्षकांनी चुकूनही दुसरीकडं जावू नये, यासाठी सतत निरनिराळ्या क्लुप्त्या करण्याच्या धडपडीत व्यग्र असतात. सध्या गाजत असलेला अलाहाबादियाचा प्रकार यातूनच घडला आहे. विशेष म्हणजे, संबंधित शोमध्ये करण्यात आलेली विधानं मूळची या इन्फ्ल्युएन्सरची नव्हती, तर ती त्याने एका विदेशी कार्यक्रमात ऐकून त्यांचा वापर आपल्याही कार्यक्रमातही करायचं ठरवलं होतं, याचे काही पुरावे समोर आले आहेत. म्हणजेच, ‘टीआरपी’सदृश लोकप्रियता मिळवत राहण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कुठलीही पातळी गाठली जाते, हे या निमित्तानं दिसून आलं.

या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा. अशी घटना घडल्यावर अनेक जण सोयिस्कररीत्या याचं खापर सरसकटपणे सोशल मीडियावर फोडून मोकळे होतात. खरं म्हणजे, यात सोशल मीडियाची चूक काय आणि किती आहे? हा एक खुला मंच आहे. तिथं कोण काय करेल, यावर या माध्यमाचं नियंत्रण नाही. एखादी घटना घडली किंवा तक्रार आली आणि त्यात तथ्य असूनही त्यासंबंधी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी काही केलं नाही, तर त्यांच्यावर ठपका ठेवणं बरोबर आहे.

मुळात सोशल मीडिया हा वर्तमानपत्रासारखा नाही. उदाहरणार्थ, संबंधित कार्यक्रमात केलेली विधानं त्या माणसानं वर्तमानपत्रातल्या आपल्या एखाद्या लेखात लिहिली असती, तर त्या वर्तमानपत्राने ती छापली असती का? अजिबातच नाही. म्हणजेच वर्तमानपत्रे, ‘लाइव्ह’ नसलेले रेडिओ आणि टीव्हीचे कार्यक्रम याठिकाणी एक संपादकीय फळी असते. लोकांपर्यंत काय पोहोचवायचं आणि नाही, हे ठरवण्याचं तारतम्य त्यांच्याकडं असतं. याउलट एखादा आपल्या इन्स्टा अकाउंटवर किंवा यूट्यूब चॅनलवर काय करेल, यावर सोशल मीडिया नियंत्रण कसं ठेवणार?

म्हणूनच आता आपण दुसरा मुद्दा विचारात घेतला, तर सोशल मीडिया कसा वापरायचा, याचं तारतम्य लोकांकडेच असलं पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये लहान मुलांवर सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतातही पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मीडिया अकाउंट वापरता येणार नाही, असा नियम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सगळं स्तुत्य आहेच; पण म्हणून आत्ता घडला तसा प्रकार पुन्हा घडणार नाही किंवा एकूणच सोशल मीडियावर एकदम जबाबदारीनं वागणारे लोक येतील, अशी आशा बाळगणं अक्षरश: दुधखुळेपणाचं ठरेल.

उदाहरणार्थ, यूट्यूब आणि व्हॉट्स ॲ‍प यांवर मिळत असलेल्या ‘टिप्स’च्या आधारे शेअर बाजारात ‘गुंतवणूक’ करून हात पोळून घेणारे लोक आणि सतत नशा चढल्यासारखे सोशल मीडियाला चिकटलेले लोक यांना कोण शहाणं करणार? आणि कसं?

म्हणजेच यामधला खरा मुद्दा तुमच्या-आमच्यासारख्या लोकांपर्यंतच येऊन ठेपतो. कुणी आजूबाजूला कचरा केला म्हणून त्याच्याशी काही संबंध नसताना आपण त्या माणसाच्या घरात जाऊन नंतर त्याविषयी तक्रार करण्यासारखा हा प्रकार आहे. त्या कचऱ्याकडं दुर्लक्ष करणं, हा त्यावरचा वैयक्तिक पातळीवरचा पहिला उपाय असतो.

सोशल मीडियावरच्या अफाट कचऱ्याच्या बाबतीत आपण हेच म्हणू शकतो. अपवाद वगळता बहुतांश प्रमाणात आपल्यालाच या सगळ्याची चटक लागली आहे. आपल्याला सतत काहीतरी नवं, अचकट विचकट, ‘हटके’ हवं असतं. त्यातूनच आपण अशा नवनव्या ‘इन्फ्ल्युएन्सर’ना जन्माला घालतो आणि आहेत त्यांना फुगवत राहतो.

त्यामुळं आपला ‘अटेन्शन स्पॅन’ अत्यंत कमी झाला आहे आणि तो आता १० ते ३० सेकंदांच्या रील्सपलीकडे जाऊ शकत नाही. एवढ्या अल्पकाळात जो आपल्याला हसवेल, आपली कसली का होईना; करमणूक करेल किंवा आपल्याला ‘व्हॉट्स ॲ‍प युनिव्हर्सिटी’चं बौद्धिक पाजेल, त्याचे आपण ‘फॉलोअर’ झालेलो असतो.

अलाहाबादियाच्या प्रकरणातील दोष पूर्णपणे त्याचा, संबंधित शोच्या संयोजकांचा आणि तो सादर करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आहेच. पण, वेळोवळी घडणाऱ्या अशा प्रकारांचा सगळा दोष संबंधित ‘इन्फ्ल्युएन्सर’ आणि सोशल मीडियावर ढकलून मोकळं होताना आपणही जरा अंतर्मुख होणार की नाही? की वाह्यातपणा करणाऱ्यांनी तो करत राहावा, पोलिसांनी कारवाई करावी, न्यायालयाने कान उपटावे, सरकारने कायदे करावे आणि आपण मात्र अशा गढूळ पाण्यात डुंबत राहावं, असं आपल्याला वाटतंय?

(संपर्कः akahate@gmail.com)



Source link