फलटण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी फलटण येथील विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी शिवजयंती साजरी करत संतोषगडावर स्वच्छता मोहीम राबवली. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांच्या मान्यता प्राप्त केंद्रात सारथी महामंडळाच्या योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरदार हिरोजी इंदलकर सारथी गडकिल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत या मोहिमेत सहभाग घेतला.
संतोषगड, जो समुद्रसपाटीपासून 2900 फूट उंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी 1630 मध्ये बांधला. किल्ल्याला मुख्य तीन दरवाजे असून तो गोमुक स्थापत्यशैलीत बांधलेला आहे. तसेच गडाच्या आत एक गुप्त दरवाजा आहे आणि गडावर आजही विहिरीमध्ये पाणी उपलब्ध आहे.
गड संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी गडाच्या स्वच्छतेबरोबरच, येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या छोट्या शिळा एकत्र करून बाजूला ठेवल्या आणि काही ठिकाणी पायऱ्या तयार करण्याचा प्रयत्न केला. मोहिमेच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर आय आय टी पासून सुरुवात करून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून संतोषगडाकडे प्रस्थान केले.
ग्रामस्थांचे स्वागत आणि मार्गदर्शन
ताथवडा गावात पोहोचल्यानंतर ग्रामसेवक, सरपंच आणि गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत कचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
संस्कृतीचा जागर – पोवाडे, भारुड आणि बाळ शिवबाचा पाळणा
गडावर पोहोचल्यानंतर दोन तासांत विद्यार्थ्यांनी संपूर्ण गड परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत पोवाडे, भारुड आणि मनोगते सादर करण्यात आली. विशेषतः महिला स्टाफने मिळून ‘बाळ शिवबाचा पाळणा’ गात या ऐतिहासिक क्षणाला एक वेगळेच रंगत दिली.
या आगळ्या-वेगळ्या शिवजयंती उत्सवामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची नव्याने ओळख झाली तसेच गडसंवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले.