
महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले व २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. मात्र सुरुवातील मुख्यमंत्रीपदावरून घोळ झाल्याने दोन आठवड्य़ानंतर म्हणजे ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या सात दिवसानंतर आता मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. भाजपने गृह, महसूल, जलसंधारण, उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, सांस्कृतिक, वन, राजशिष्टाचार, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान आदि मंत्रालये आपल्याकडे ठेवली आहेत. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मंत्रिपदावरून वाद सुरू होता. भाजप आणि शिवसेनेने अर्थ, गृह आणि नगरविकास मंत्रालयावर दावा केला होता. अजित पवार यांनी नगरविकास मंत्रालयावरही दावा केला होता. याबाबत आता निर्णय जाहीर झाला असून गृहमंत्रीपद भाजपकडे, नगरविकास आणि गृहनिर्माण खाते एकनाथ शिंदेंकडे तर अर्थखाते अजित पवारांकडे देण्य़ात आले आहे.







