
रूमी जाफरी, चित्रपट लेखक-दिग्दर्शक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एका चित्रपटातील दृश्यात गोविंदासोबत कादर खान. बॉलीवूडच्या चर्चित कॉमेडी जोड्यांमध्ये गोविंदा आणि कादर खान यांची जुगलबंदी सर्वाधिक गाजली.
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज मी कादर खान यांच्याविषयी सांगणार आहे. कादरभाईंना मी एकदा विचारले, ‘भाईजान, तुम्ही सुरूवात तर संवादलेखक आणि खलनायकाच्या भूमिकांनी केली होती. खलनायक म्हणून तुम्ही लोकांना आवडलातही. पण, तुम्हाला कॉमेडी करण्याचा विचार कसा सुचला?’ त्यावर ते म्हणाले, ‘मी नाटकांमध्ये काम करत होतो, शिक्षक होतो- मुलांना शिकवायचो. माझा सिनेमा रिलीज झाला. त्यात मी खलनायकाची भूमिका केली होती. तेव्हा माझी मुलं छोटी होती. सिनेमात मला मार खाताना बघून ते रडायचे. मला म्हणायचे, ‘अब्बा, तुम्ही का मार खाताय?’ माझी पत्नीही म्हणायची की परिवारात हे चांगले दिसत नाही. माझ्या विद्यार्थ्यांना देखील वाईट वाटायचे. वास्तविक, मला मार खाण्याचे पैसे मिळतात, असे मी सगळ्यांना सांगायचो. पण, माझ्या या युक्तिवादावर कुणीच समाधानी नव्हते. मग मी विचार केला की, कॉमेडी करून बघूया. कॉमेडी करायला लागल्यावर मी लोकांना जास्त आवडू लागलो. तसेही लोकांना हसायला खूप आवडतं. मलाही विनोदी कथा-संवाद लिहायला आणि तशा भूमिका करण्यात मजा येऊ लागली. असंही नाही की मी गंभीर विषयावर काम केलेच नाही. जेव्हा संधी मिळायची तेव्हा मी तेही लिहायचो. मी ‘अंगार’चे डायलॉग लिहिले, त्यासाठी मला ‘फिल्मफेअर’ही मिळाले.’
मी कादरभाईंना म्हणालो की, मला तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे. तुमचे कुटुंब व्यवसाय करणारे आहे. तुमच्या घरात कोणीही लेखन करणारे नाही. मग तुम्हालाच लेखनात कसा काय रस वाटला? त्यावर कादरभाईं सांगितले, ‘मी काबुलमध्ये राहणारा अफगाणी आहे, हे तुला माहीतच आहे. आम्ही मुंबईत आलो तेव्हा सर्वांत कुप्रसिद्ध आणि धोकादायक अशा कामाठीपुऱ्यात घर घेतले होते. हा भाग तेव्हा गुन्ह्यांचे केंद्रस्थान होता. मी ६-७ वर्षांचा होतो. आजूबाजूची मुलं पिशव्या, लिफाफे बनवून विकायची. २-३ रूपये कमवायची. मी आईला म्हणालो, की मीपण पिशव्या बनवेन आणि दररोज २-३ रूपये कमावेन. आई म्हणाली, ‘तू लिफाफे बनवायला लागलास तर ३ रूपयांतच अडकून पडशील. पण, शिकलास, अभ्यासाकडं लक्ष दिलंस तर तीन हजार किंवा तीन लाखही कमवशील. मोठा माणूस होशील.’ मी युक्तिवाद केला.. ‘माँ, अल्लाहची इच्छा असेल तर मी लिफाफे बनवूनही मोठा माणूस बनू शकतो.’ ती म्हणाली, ‘बेटा, शिकणे ही अल्लाहचीच आज्ञा आहे. तुला कुराण शरीफचा पहिला शब्द माहीत आहे का?’ मी ‘नाही’ म्हटलं. ती म्हणाली, ‘इकरा’. इकराचा अर्थ होतो शिका. त्यामुळं शिकणे हा अल्लाहचाच हुकूम आहे. तू अभ्यासाकडं लक्ष दे, संपत्ती तुझ्या पायाशी लोळण घेईल.’
कादरभाई सांगत होते… ‘मी आईचं ऐकलं आणि अभ्यासाला सुरूवात केली. खूप शिकलो. तू पाहिलं असेल, माझ्या हातात नेहमी कुठलं ना कुठलं पुस्तक असतं. त्यानंतर शिक्षक झालो, शिकवू लागलो. साहित्य वाचले, नाटके लिहिली आणि आज मी लेखक बनलोय. आज लेखनात मला जे नाव मिळालंय, त्याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं. तिने मला योग्य वयात योग्य मार्ग दाखवला. यावरुन मला मुनव्वर राणा यांचा एक शेर आठवतोय…
घेर लेने को जब
बलाएं आ गई,
ढाल बनकर मां की
दुआएं आ गईं।
कादरभाईंना आईच्या उपदेशाचा फायदा झाला आणि मला कादरभाईंच्या सल्ल्याचा उपयोग झाला. माझ्या सुरूवातीच्या काळातील, म्हणजे १९९१ ची घटना आहे. मी कुठल्या तरी गोष्टीबाबत कादरभाईंचा सल्ला घ्यायला गेलो होतो. त्यांनी मला समजावलं. म्हणाले, ‘रूमी आज मी तुला माझ्या अनुभवाचं सार देतोय. यशस्वी होण्याचया फॉर्म्युला सांगतोय..’ मी त्यांना ‘कृपया सांगा..’ म्हटलं. त्यांनी सांगितलं, ‘मी शिक्षक होतो, शिकवत होतो. पुढे मला रमेश बहल यांचे जवानी दीवानी, रफूचक्कर, रोटी हे चित्रपट लिहिण्यासाठी मिळाले. हे मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरांचे चित्रपट होते. मी केवळ माझ्या खोलीत बसूनच कथा लिहायचो. शूटिंगला जायचाे, शिकवायला जायचो आणि निर्माता, दिग्दर्शकांना सीन ऐकवायला जायचाे. मला माझी रायटिंग रूम आणि शूटिंगच्या शिवाय काहीही दिसतं नव्हतं. माझ्याकडं वेळ नसल्यामुळं माझा सर्वसामान्यांशी संवाद नव्हता. सिनेमे रिलीज होत राहिले, चालत राहिले. माझा एक सिनेमा खूप हिट झाला. एका पंचतारांकित हॉटेलात त्याचा ‘गोल्डन ज्युबिली’सोहळा होता. मलाही बोलावले होते. मी विचारलं, माझं तिथं काय काम? ते म्हणाले की, तुम्हाला गोल्डन ज्युबिलीची ट्राॅफी मिळेल, त्यामुळं पार्टीला नक्की या. मी ‘ठीक आहे’ म्हणालो. पण, मला पार्ट्यांचा कधीच शौक नव्हता. मी घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. सगळेच मला म्हणाले की, कार्यक्रमाला जा आणि ट्रॉफी घेऊन या.
मला थोडं नैराश्य आलं. मनात विचार आला.. आपण गेलो आणि हॉटेलच्या दारातच कुणी अडवलं, आत जाऊच दिलं नाही तर? मला ओळखतंय कोण? आपला अपमान होईल, अशीच भीती वाटत होती. पण, सगळ्यांनी खूप आग्रह केल्यावर मी धास्तीतच ते हॉटेल गाठलं. टॅक्सीतून उतरून पुढे निघालो, तर तिथं मोठी गर्दी होती. मीडियाचे प्रतिनिधी आणि सामान्य लोकही होते. मला पाहताच ते ओरडू लागले.. ओ कादर खान.. हे बघा कादर खान.. लोक ऑटोग्राफसाठी माझ्याकडं धावले. माझे फोटो काढू लागले. खूप गर्दी जमली. एवढ्यात आतून प्रॉडक्शन टीमचे लोक आले आणि त्यांनी गर्दीतून बाहेर काढत मला आत नेले. मी पार्टीत सगळ्यांना भेटलो. मला ट्रॉफी मिळाली.’
मग त्यांनी मला विचारलं, ‘याचा अर्थ समजला का तुला? मी ‘नाही’ म्हटलं. कादरभाई म्हणाले, ‘बेटा, याचा अर्थ हाच की, आपलं चित्रपट लेखनाचं काम असं आहे की, तुम्ही एका खोलीत बसून जेवढी मेहनत घ्याल, तेवढे तुमचे काम जगापर्यंत पोहोचेल, जग तुम्हाला ओळखू लागेल. आपल्या एका खोलीत कागद, पेन घेऊन बसा आणि मग बघा तुमचं नाव जगापर्यंत कसं पोहोचतं. कादरभाईंचा सल्ल्याप्रमाणं मीसुद्धा एका खोलीत बसून लिहायला सुरूवात केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी इतक्या चित्रपटांच्या कथा लिहू शकलो. मी कादरभाईंचे मनापासून ऋण व्यक्त करतो. कादरभाईंच्या आठवणीत त्यांच्या ‘काला बाजार’ चित्रपटातील हे गाणं ऐका…
ठन ठन की सुनो झंकार,
ये दुनिया हैं काला बाज़ार,
पैसा बोलता है,
पैसा बोलता है…
स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.