
चित्रपट कसा आकाराला आला हे सांगताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सहज म्हणून आम्ही शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्नील यांना या कथेच्या वाचनासाठी बोलावले. हसून हसून हैराण झाले ते. आमची मैत्रीण तृप्ती पाटील हिने ही त्यात उडी मारली. सहज वाचनासाठी जमलेला हा संच, तितक्याच सहजपणे आणि झटक्यात निर्मात्यांचा समूह बनला.” निर्मात्या शर्मिष्ठा राऊत म्हणाल्या, “आम्ही जेवढी कल्पना केली होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मजा, चित्रपट करताना आम्हाला आली. एका वेगळ्या विषयावरील हा चित्रपट तेवढ्याच कुशलतेने दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी हाताळला असून, त्याला चित्रपटातील दिग्गज कलाकारंनी तेवढाच हातभार लावला आहे. मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला ‘वाळवी’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला आणि लोकप्रिय झाला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट, वाळवी यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या टीमची ही पुढील प्रस्तुती आहे.