लोक-संचित: काळ मातला मातला…

0
14
लोक-संचित: काळ मातला मातला…


प्रवीण दशरथ बांदेकर12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या काळाने आमच्या जिभा छाटून टाकल्यात. आमचे मेंदू बधीर करून टाकलेत. निव्वळ निव्वळ वखवखलेल्या वासना असलेली रानटी जनावरं बनून गेलो आहोत आम्ही. शिवाय, असंवेदनशीलतेबरोबर निर्बुद्धपणाही पराकोटीचा जाणवत राहिला आहे. माझी जात, माझा धर्म, माझे देव, माझे पुढारी या परते माणूस म्हणून जगण्यासाठी आणखीन काही असू शकतं, हे आपल्या मनातही येऊ नये, इतकं हे बथ्थडपण जगणं व्यापून राहिलं आहे.

काल-परवाच तर शाळा-कॉलेज सुरू झाली आहेत. मुला-मुलींच्या एकमेकांशी अजून धड ओळखीपाळखीही झालेल्या नाहीत. तरीही, काल-परवाच कधी तरी, एका मुलाने आठ-दहा मुलांची गँग बनवून एका मुलीचा पाठलाग केला. तक्रार झाली. चौकशी झाली. त्या मुलाला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. बाकीच्यांना समज देण्यात आली. पण मग या घटनेला फाटे फुटू लागले. राजकीय हस्तक्षेप सुरू झाले. धार्मिक आणि जातीय रंग फासले जाऊ लागले. प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं. साहजिकच, मॅनेजमेंटनं बिनशर्त माघार घेणं, मुलीच्या पालकांकडून आपली काही चूक नसल्याचं पत्र घेणं, मुलीला कॉलेजमधून काढून घरी बसवणं वगैरे गोष्टी रीतीप्रमाणे पार पडल्या. प्रकरणावर पडदा पडला. लोक सगळं विसरून गेले. रोजचं रुटीन मागील पानावरून पुढे सुरू झालं. आसपास कुठेही घडणारी ही घटना. ही एकच असं नव्हे, अशा कैक घटना रोज आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपण त्यात गुरफटत जातो; अस्वस्थ होतो; जिवाला त्रास करून घेतो. काही दिवसांनी त्यातून बाहेर येतो, विसरून जातो. तोवर दुसरंच काही तरी समोर आलेलं असतं. मग पुन्हा तेच आणि तसंच घडत राहतं. कधी थेट आपल्याशी संबंधित, कधी दुरान्वयानेही आपल्याशी संबंधित नसलेलं. पण तरीही आपल्याला ते टाळता येत नाही. आपण जगत असलेल्या वर्तमानाचा, आपल्या वाट्याला आलेल्या काळाचा तो एक भाग असतो. आपण कितीही कानाडोळा केला, अलिप्त राहावं म्हटलं, तरी आपल्याला आतल्या आत ते कुरतडत राहतं. छळत राहतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र काळ इतका का सोकावला आहे? इतक्या कशा संवेदना बोथट झाल्यात? हे बथ्थडपण, हे अविवेकी वागणं, इतकं कसं रुजत गेलं या मेंदूंमध्ये? ज्या देशात आयाबायांच्या अब्रूच्या रक्षणासाठी माणसांनी प्राण पणाला लावले, प्रसंगी राज्ये गमावली, देशोधडीला लागले, त्याच देशाची माती इतकी कशी बदलून गेली? हे कुठले उन्माद, कुठला हिंस्त्रपणा या काळाने लादलाय आमच्यावर? आपल्याच वाट्याला का आलाय हा भयंकर क्रूर काळ? त्रासदायक आहे हे सगळं. त्रास होतोय, प्रचंड त्रास होतोय विचार करताना. हे असं बाहेर जसं सतत काही ना काही घडत असतं, तसंच ते आपल्या आतही सतत घडत राहिलेलं असतं. बाहेर घडणारं आणि आपल्या कानां-डोळ्यांपर्यंत येऊन पोचणारं बहुतेक बरचंसं आपल्याला असं त्रासदायक वाटणारं असतं. आपल्या आत घडणाऱ्याबद्दलही तसंच म्हणावं लागेल. तेही तितकंच दुखरं, ठणका लावणारं, जिवाची घालमेल करणारं असंच असतं. कितीही ठरवलं तरी, आपल्या घरात, गल्लीत, आवाठात, कामाच्या ठिकाणी, राज्यात, देशात आणि पार अगदी दुनियेच्या कानाकोपऱ्यांत कुठंही घडणारं नजरेआड करता येत नाही. आपली इच्छा असो, नसो; ते आपल्या मेंदूत घुसत असतं. अस्वस्थ बनवत असतं. अशा वेळी, आपण चुकीच्या काळात जन्माला आलो आहोत, असं अनेकदा मनात येतं. खरं तर, चुकीचा काळ म्हणजे काय, हेही आपल्याला नेमकेपणाने सांगता यायचं नाही. या आधीचा काळ जन्माला यायला योग्य होता नि आताच सगळं बिघडून गेलं आहे, असं काही समजणंही तितकंच चुकीचं आहे. लहानपणी रामायणातल्या गोष्टी, शिवाजी महाराजांचे पराक्रम, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या रोमहर्षक गोष्टी वगैरे वाचनाना मला नेहमी वाटायचं, आपण तेव्हा का जन्माला आलो नाही? म्हणजे मग आपण अगदीच काही नाही तरी रामाच्या सैन्यातला एखादा वानर तरी झालो असतो. किंवा मग, शिवाजी महाराजांचा एखादा मावळा म्हणून तरी जन्मायला हवं होतं. स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आलो असतो, तर बाबू गेनूसारखं वगैरे आपणही काही तरी नक्कीच केलं असतं. म्हणजे पुन्हा तेच! आजच्या काळात करण्यासारखं काहीच नाहीय आणि आपण आता नुसतेच निरर्थक जगत वाया जातोय. पण मग हळूहळू, घडत्या आणि वाढत्या वयात करण्यासारखं खूप काही आहे, फक्त लढाया करणं म्हणजेच देशसेवा नव्हे, याचंही आपसूकच भान येत गेलं. मग अर्थातच आपल्या मनोधर्माप्रमाणे स्वीकारलेल्या क्षेत्रात काम करताना जमेल तसं आपला काळ समजून घेत राहणं, भवतालाविषयी संवेदनशील राहत झेपेल तितका अवकाश कवेत घेणं, आयुष्यभरासाठी सुरू राहिलं होतं. पण, गेल्या काही वर्षांपासून हे इतकंही करण्यापासून आपल्याला रोखण्यात येतंय, हेही जाणवू लागलंय. उपलब्ध माध्यमांचा वापर करून तुम्ही आमच्या नजरेखाली आहात, तुमच्या प्रत्येक कृती-उक्तीवर आमचे नियंत्रण आहे, याचा कधी आडून, आडून तर कधी थेटपणे इशारा दिला जातोय, ही अस्वस्थ करणारी जाणीव सतत होते आहे. बाहेर जे काही चाललं आहे, त्याची तुम्ही दखल घ्यायची नाही, जे घडतंय त्यावर साधी प्रतिक्रियाही द्यायची नाही, जे घडतंय वा घडवलं जातंय, ते व्यापक देशहिताचं आहे, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे, असं समजून निमूट राहायचं. असं वाटतंय की, या काळाने आमच्या जिभा छाटून टाकल्यात. आमचे मेंदू बधीर करून टाकलेत. निव्वळ निव्वळ वखवखलेल्या वासना असलेली रानटी जनावरं बनून गेलो आहोत आम्ही. शिवाय, असंवेदनशीलतेबरोबर निर्बुद्धपणाही पराकोटीचा जाणवत राहिला आहे. माझी जात, माझा धर्म, माझे देव, माझे पुढारी या परते माणूस म्हणून जगण्यासाठी आणखीन काही असू शकतं, हे आपल्या मनातही येऊ नये, इतकं हे बथ्थडपण जगणं व्यापून राहिलं आहे. मला इतिहासाविषयी काही वाटत नाहीय, भूतकाळातल्या माझ्याच पूर्वजांनी पराकोटीच्या अभावात जगतानाही गाजवलेल्या कर्तृत्वाविषयी जाणून घ्यावंसं वाटत नाहीय. मला इतिहास आणि भूतकाळ हवा आहे, तो माझ्या सोयीनं. किंवा खरं तर, ज्यांच्याकडे मी माझा मेंदू राजीखुशीनं सोपवला आहे, त्यांना सोयिस्कर ठरेल असाच तो मला बदलून, मोडतोड करून हवा आहे. माझा भूतकाळ आणि माझा समकाळ समजून न घेण्यातच माझं भलं आहे, एवढंच मला माहीत आहे. त्रास होतोय तो याच गोष्टीचा! त्यातूनच मग अलीकडं सारखं वाटत राहतं, आपल्याला हा संवेदनशील असण्याचा शाप कुणी दिला असावा? का नाही बाकीच्यांसारखं माझंही मन दगड बनून जात? मणिपूरमध्ये काय चाललंय? बारसूमध्ये कोण रडतंय? आपल्या आदर्शांना कोण गोळ्या घालून संपवू पाहतंय? का आणि कशासाठी आपण इतके हळहळतोय? यार येरू, तू कसलाही विचार नको ना करूस! डोळे, कान, तोंड बंद करून जगत राहा ना बाकीच्यांसारखं! असं आपल्याला स्वतःला का बजावून सांगता येत नाहीय? एकेकदा वाटतं, सूर्य मावळून हळूहळू काळोख गडद होत गेल्यावर मिणमिणत राहणं, हे जसं काजव्यांचं भागधेय असतं, तसंच असावं हे. आपली अस्वस्थता, विवेकी जगणं, धुगधुगती संवेदनशीलता आपण ही अशीच मिणमिणती ठेवली पाहिजे. कधी कूस पालटेल हा काळ, माहीत नाही. तोवर माथ्यावरच्या या काळवंडलेल्या आभाळातले हे उदासीन तारे आणि पायतळीच्या किडलेल्या मातीतले हे सरपटत पायांखाली येणारे वळवळणारे कृमी सहन करत राहणं भाग आहे. नव्हें तें चि करी न भे कळिकाळा, तुका म्हणे लीळा खेळे मानू… असं म्हणत आपल्या वाट्याला आलेल्या काळाचा वोळसा सोसणारे जगतगुरू तुकाराम महाराज तर हरक्षणाला आपल्या सोबतच असतात. म्हणूनच तर, या कळिकाळाला न भीता काळाच्या या विक्राळ लीळांना वाकुल्या दाखवत पुढे चालायचं बळ मिळत असतं ना!

samwadpravin@gmail.com



Source link