फलटण : लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्क इंडियाच्या वतीने आयोजित वर्षावास-२०२६ धम्मसंकल्प अभियानांतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म व लोकशाही’ या विषयावर विशेष धम्मसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आरडगाव, ता. फलटण, जि. सातारा येथील पंचशील बुद्धविहार येथे होणार आहे. भारतीय बौद्ध महासभा, आरडगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास मा. अशोकराव गायकवाड (बापू), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, आर.पी.आय. (आठवले), भंते नागप्रकाश, भंते धम्मानंद, प्रा. विनोद बागडे, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कचे संचालक सचिन मून तसेच दंगलकार नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रकाश कदम असून सूत्रसंचालन सतिश काकडे करणार आहेत. भारतीय बौद्ध महासभा, आरडगावचे अध्यक्ष राजेश अशोक काकडे, उपाध्यक्ष निलेश यादव काकडे, संघटन सचिव सुहास सुरेश काकडे व खजिनदार ओंकार विक्रमकुमार काकडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या धम्मसंवादातून बौद्ध धम्मातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, विवेक आणि नैतिकता तसेच लोकशाही मूल्ये यांचा परस्परसंबंध उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या बौद्ध धम्माच्या सामाजिक व लोकशाहीवादी भूमिकेवर या निमित्ताने विचारमंथन होणार असल्याने फलटण तालुक्यातील बौद्ध उपासक-उपासिका, धम्मप्रेमी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून धम्मसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भीमगौरव तरुण मंडळ, आरडगावचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष जगन्नाथ काकडे, सचिव आनंद काकडे, उपाध्यक्ष गौतम काकडे, खजिनदार बाळासाहेब काकडे तसेच भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा व फलटण तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
