
मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या तत्परतेने पालखी मार्गावरील धोकादायक खड्ड्याची दोन तासांत दुरुस्ती
फलटण | प्रतिनिधी :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गालगत तसेच मध्यवर्ती नियंत्रण कक्षाजवळ असलेला धोकादायक खड्डा अखेर नगर परिषदेने तातडीने दुरुस्त केला. हा खड्डा अनेक दिवसांपासून कायम असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः निवडणूक कर्मचाऱ्यांची वाहने या खड्ड्यात अडकण्याच्या घटना वारंवार घडत होत्या.
दि. १७ जुलै २०२६ रोजी पालखी प्रस्थान होणार असल्याने हजारो वारकरी आणि भाविक या मार्गाने जाणार आहेत. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.
याबाबत फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला त्वरित सूचना दिल्या. त्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे अवघ्या दोन तासांच्या आत संबंधित खड्ड्याची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली.
नागरिकांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या तातडीच्या निर्णयाचे स्वागत करत, पालखी सोहळ्यापूर्वी धोकादायक ठिकाण सुरक्षित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.









