
फलटण प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील चार वीर जवानांनी देशसेवेत प्राणांची आहुती दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला जिल्ह्यातील एका जवानाला वीरगती प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मकर संक्रांतीचा सण न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त लक्ष्मी विलास पॅलेस येथे होणारा पारंपरिक तिळगुळ व सणाचा कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला आहे. शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
अवघ्या तीन दिवसांत चार भारतीय जवान हौतात्म्यास प्राप्त झाल्याच्या या अत्यंत दुर्दैवी घटनांनी संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना १२ मराठा इन्फंट्रीचे जवान वैभव श्रीकृष्ण लहाने (मु. कपिलेश्वर, जि. अकोला) यांनी देशासाठी बलिदान दिले.
तसेच दक्षिण आफ्रिकेतील शांतता मोहीमेवर कार्यरत असताना सातारा जिल्ह्यातील जवानानी देशसेवेचा सर्वोच्च त्याग केला. यामध्ये
नायक विलास विठ्ठल गावडे (मु. बरड, ता. फलटण, जि. सातारा), तसेच
जवान अभिजीत माने (मु. भोसे, ता. कोरेगाव, जि. सातारा)
आणि जवान प्रमोद परशुराम जाधव (मु. दरे, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
जवान अभिजीत माने यांनी तर अवघ्या आठ तासांच्या आपल्या नवजात बाळाला न पाहता आले ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.
या सर्व शहीद जवानांच्या बलिदानाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण राज्य सहभागी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.








