
पुणे – कोंढवा परिसरात झालेल्या गणेश किसन काळे (रा. येवलेवाडी) या रिक्षाचालक तरुणाच्या हत्येमागे टोळीयुद्ध असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आंदेकर टोळीकडून ही हत्या केल्याचे समोर आले असून, आतापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत. पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह पाच जणांना अटक केली आहे, तर तुरुंगात असलेल्या बंडू आंदेकरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश काळे याची हत्या १ नोव्हेंबर रोजी दुपारी कोंढवा येथील खडी मशीन चौकात करण्यात आली. दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळीबार केला तसेच कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिसांनी रात्रीच या प्रकरणातील आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अमन मेहबूब शेख (वय 23, रा. काकडे वस्ती, कोंढवा), अरबाज अहमद पटेल (वय 24, रा. काकडे वस्ती, कोंढवा), मयूर वाघमारे (वय 23) आणि दोन अल्पवयीन मुलगे असे आहेत.
१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. त्यानंतर आंदेकर टोळीने बदला घेण्याची शपथ घेतली होती. पोलिसांनी त्या कटाचा पर्दाफाश केल्यानंतरही, ५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकर याची हत्या करून टोळीने पुन्हा दहशत माजवली. या प्रकरणात आंदेकर कुटुंब तुरुंगात आहे.
गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ आहे. समीरने त्या हत्येसाठी हत्यारे पुरवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे गणेशची हत्या ही बदला घेण्यासाठी आणि टोळीयुद्धातून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी कृष्णा आंदेकर (वय 28), बंडू आंदेकर (वय 69), स्वराज वाडेकर (वय 25), अमीर खान (वय 25), मयूर वाघमारे (वय 23), अमन मेहबूब शेख (वय 23), अरबाज अहमद पटेल (वय 24) आणि दोन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गणेश काळे यांचे वडील किसन काळे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.




