वेळापूर (ता. माळशिरस) – पालखी महामार्गावरील वेळापूर गावातील महत्त्वाच्या पालखी चौकात असलेल्या उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात आले असून, हा पुढाकार पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी घेतला आहे.
सध्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्याअंतर्गत अनेक ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पुलांना थोर समाजपुरुषांची नावे देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला असून, यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा मान्यवरांचा समावेश आहे.
त्याच धर्तीवर, वेळापूर येथील अकलूज-सांगोला व माळशिरस-पंढरपूर मार्गाच्या संगमावर असलेल्या पालखी चौकातील उड्डाणपुलास शिवप्रेमींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे गौरवपूर्ण नाव देण्याचा निर्णय घेतला. या नाविकरणाबाबत शिवप्रेमींनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेत त्यांना याबाबतची पूर्वकल्पना दिली आहे.
हा ऐतिहासिक निर्णय शिवप्रेमींच्या एकजुटीचे व संस्कृतीप्रेमाचे प्रतीक ठरला आहे.