रसिक स्पेशल: ‘एआय’मुळे आणखी घातक ठरू शकते हेरगिरी

0
2
रसिक स्पेशल:  ‘एआय’मुळे आणखी घातक ठरू शकते हेरगिरी


अतुल कहाते13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘अल कायदा’चे दहशतवादी ९ / ११ च्या हल्ल्याआधी तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी एकमेकांना वाघांची चित्रं ई मेलने पाठवायचे. वरकरणी त्यात काहीच वावगं वाटत नसलं, तरी ते या चित्रांमधून आपल्या गुप्त संदेशांची देवाणघेवाण कराचये. आता अशा गोष्टींच्या मदतीला ‘एआय’ आलं आहे. आणि त्यामुळेच धोका आणखी वाढला आहे!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध हाती घेतलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ एकीकडे सुरू असतानाच एक नवीनच प्रकरण उभं राहिलं आहे. ‘यूट्यूबर’ म्हणून प्रसिद्ध असलेली ज्योती मल्होत्रा ही भारतीय महिला आणि इतर काही लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. भारतासाठी महत्त्वाची असलेली अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानी लष्कराच्या आणि अधिकाऱ्यांच्या हाती लागत असल्याचं त्यातून स्पष्ट झालं. स्वाभाविकच, देशाच्या सुरक्षिततेसाठी असे प्रकार अतिशय घातक आणि गंभीर असल्याचा मुद्दा नव्यानं समोर आला. दहशतवादी संघटनांपासून ते अशी हेरगिरी करणाऱ्या लोकांपर्यंत अनेकांनी आजवर तंत्रज्ञानाचा गैरवापर करून निरनिराळे प्रकार केले आहेत. पण, आता ‘एआय’च्या युगात या प्रकारांनी आणखी गंभीर वळण घेतलं असल्यानं यातून काय घडू शकेल, याचा अंदाज बांधणं महत्त्वाचं ठरलं आहे.

1. डीप फेक, व्हॉइस क्लोनिंग

यातील पहिला संभाव्य धोका आपण काही प्रमाणात आधीच अनुभवत आहोत. तो म्हणजे, ‘डीप फेक’ आणि ‘व्हॉइस क्लोनिंग’ या तंत्रज्ञानांचा. आपल्याला हवी असलेली विधानं एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या तोंडून वदवून घेतल्यासारखी खोटेपणानं सादर करण्यासाठी या तंत्रज्ञानांचा गैरवापर होऊ शकतो. म्हणजेच, युद्धाच्या प्रसंगी किंवा एखाद्या अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेल्या मोहिमेच्या आधी लष्करप्रमुखांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न दिलेला आदेश त्यांनीच दिल्यासारखा भासवून लष्कराला त्यानुसार कारवाई करायला भाग पाडणं किंवा ती करण्यापासून रोखणं असे चित्रविचित्र प्रकार यातून घडू शकतात. कुणाच्याही आवाजाचे पुरेसे नमुने गोळा करून ते ‘एआय’ला दिले, तर त्यातून प्रशिक्षण घेऊन ‘एआय’ आपल्याला या आवाजांच्या नमुन्यांआधारे त्या माणसाच्या आवाजात, पण त्याने न केलेलं वक्तव्य तयार करून देऊ शकते. याहून भयानक म्हणजे, त्या माणसाचे फोटो / व्हिडिओ अशा दृश्यांचे नमुने वापरुन नुसता आवाजीच नव्हे, तर दृश्य प्रकारचा संदेशही यातून तयार होऊ शकतो. आणि त्यामुळे अक्षरश: हाहाकार माजू शकतो. एखाद्या अण्वस्त्रसज्ज देशाकडून अशा प्रकारचा संदेश कुणीतरी प्रसारित केल्यास आणि त्याच्या सत्यासत्यतेची खातरजमा न झाल्यास महाविनाशाकडे जगाचे पाऊल पडू शकते. म्हणूनच या गोष्टी टाळण्यासाठीची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करणं आता अपरिहार्य व्हायला हवं. प्रत्यक्ष खातरजमा होईपर्यंत अशा कोणत्याही प्रकारच्या आदेशांवर अंमलबजावणी करायची नाही, हे स्पष्टपणे ठरवलं गेलं पाहिजे.

2. संभाव्य विचार-कृतीचा अंदाज

दुसरा धोका म्हणजे, आपला शत्रू नेमका कोणत्या प्रकारे विचार करतो, आत्तापर्यंत त्यानं काय पावलं उचलली आहेत, त्याची धोरणं काय आहेत, या सगळ्या माहितीचे साठे ‘एआय’ला पुरवून यापुढे तो नेमका काय करेल, याचा अंदाज हेरगिरी करत असलेल्या लोकांना लागू शकतो. याचं कारण मानवी मेंदूसारखा विचार करणं आणि त्यासारखी कृती करणं, हे आता ‘एआय’ला सहजपणे जमत आहे. त्यामुळं भविष्यात मानवी मेंदू कसा विचार करेल आणि त्यानुसार काय कृती करेल, याचा अंदाज ‘एआय’ बांधू शकतं. साहजिकच, या शक्यतेनुसार आपले कारनामे सुरू ठेवण्यासाठी, पकडले न जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या गोष्टी हेरगिरी करणाऱ्या देशद्रोही लोकांना समजू शकतात. ‘एआय’चे जनक जेफ्री हिंटन यांनी या संदर्भात काहीशा वेगळ्या पातळीवर मोठा इशारा देऊन ठेवलेलाच आहे.

3. ‘एआय’च करेल हेरगिरी

तिसरा धोका म्हणजे, ‘एआय’ प्रणालीकडून प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या, पण माणसासारख्या कृती करून घेणं. म्हणजेच, आपण जणू माणसाशीच बोलत आहोत, असं पलीकडच्या माणसाला वाटावं. उदाहरणार्थ, एखादा हेर ज्याप्रमाणे काम करतो, त्याच धर्तीवर अशा ‘एआय’ प्रणालीला काम करायला लावायचं. साहजिकच, पलीकडच्या माणसाला आमीष वा भीती दाखवून किंवा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकावून ही ‘एआय’ प्रणाली महत्त्वाची माहिती मिळवू शकेल. चुकून ही हेरगिरी पलीकडच्या माणसाच्या किंवा यंत्रणेच्या लक्षात आलीच, तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण पकडणार कुणाला? ‘एआय’ला? आणि ते कसं? त्यामुळे हेरगिरी करण्यासाठी अशा प्रणाली तयार करणं आणि तपास यंत्रणांना गुंगारा देणं, असे प्रकार यातून घडू शकतात.

4. गायब होणारं ‘मॅलवेअर’

चौथा धोका म्हणजे, पारंपरिक पद्धतीने कुठल्याही देशाच्या संगणकीय यंत्रणा भेदून, त्यातून माहिती चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेरांना आता या प्रयत्नांमध्ये ‘एआय’चा वापर करता येऊ शकतो. या पद्धतीने माहिती चोरण्यासाठी वापरत असलेले, ‘मॅलवेअर’ म्हणून ओळखले जाणारे सॉफ्टवेअर पकडले जाऊ नये म्हणून त्यात ते ऐनवेळी बदल घडवू शकतात. म्हणजेच चोराने तो अगदी पकडला जात असताना अचानक पोलिसांन गुंगारा द्यावा, त्या शिताफीने हे ‘मॅलवेअर’ आपल्यामध्ये एकाएकी बदल घडवून आणतं. यामुळे प्रतिस्पर्ध्याला त्याचा ठावठिकाणा लागत असतानाच अचानक ते ‘गायब’ होतं! हे करण्यासाठी ‘एआय’चा उपयोग होऊ शकतो. कारण नेमके कोणते बदल ‘मॅलवेअर’मध्ये केले पाहिजेत, हे ‘एआय’ ठरवतं. साहजिकच, अशा प्रकारचं ‘मॅलवेअर’ हे सॉफ्टवेअर आपलं अस्तित्व सतत बदलत राहून पकडलं जाऊ नये, यासाठीची दक्षता घेत राहू शकतं.

लेखाचा समारोप करताना, ९ / ११ च्या हल्ल्याआधी ‘अल कायदा’च्या दहशतवाद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची आठवण होते. तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी हे लोक एकमेकांना वाघांची चित्रं ई मेलने पाठवायचे. वरकरणी त्यात काहीच वावगं वाटत नसलं, तरी हे दहशतवादी या वाघांच्या चित्रांच्या आत लपवून आपले गुप्त संदेश पाठवत असत. तांत्रिक भाषेत याला ‘स्टेगॅनोग्राफी’ असं म्हणतात. आता अशा सगळ्या गोष्टींच्या मदतीला ‘एआय’ आलं आहे. आणि त्यामुळेच धोका आणखी वाढला आहे.

(संपर्कः akahate@gmail.com)



Source link