
गायीला राज्यमातेचा दर्जा देत गोशाळांना प्रत्येक गायीमागे दररोज ५० रुपये अनुदान देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनीही तोफ डागली आहे. ‘वीर सावरकर असते तर ह्या निर्णयाबद्दल सरकारच्या कानाखाली मारली असती,’ असं राऊत म्हणाले. तसंच, भाजपशासित गोवा व अरुणाचल प्रदेशमध्ये गोमांस विक्रीवर बंदी का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.







