
देशात बेरोजगारीच्या समस्येने इतके उग्र रुप धारण केलय की उच्चविद्याविभूषित तरुणांच्या हातात काम नसल्याचे चित्र देशाच्या अनेक भागात दिसून येत आहे. त्यामुळे देशात अनेक बेरोजगार तरुण त्यांच्या मनाविरुद्ध वाट्टेल ती नोकरी स्वीकारण्यास तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हरयाणामध्ये विविध सरकारी विभाग आणि महामंडळांमध्ये काम करण्यासाठी शासनाकडून कंत्राटी पद्धतीवर १५ हजार रुपये महिना पगारावर भरण्यात येत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या पदासाठी लाखापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जांमध्ये चक्क पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. हरयाणा कौशल्य रोजगार महामंडळ (HKRN) कडून ६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचारी भरतीसाठी वेबसाइटच्या माध्यमातून राज्यभरातून अर्ज मागवण्यात आले होते. यादरम्यान महामंडळाला एकूण १ लाख ६३ हजार २७९ अर्ज प्राप्त झाले. या अर्जदारांमध्ये सर्वाधिक अर्ज हे बारावीपर्यंत शिकलेल्या १ लाख १७ हजार १४४ तरुण अर्जदार आहेत. तर ३९,९९० जणांचे शिक्षण पदवीपर्यंत आणि ६,११२ जणांचे शिक्षण हे पदव्युत्तर पदवीपर्यंत झाल्याचे दिसून आले आहे.